साऊथदॅम्पटन – सराव सत्रामध्ये बुमराहाचा चेंडू पायावर आदळल्यामुळे जखमी झालेला विजय शंकर तंदुरुस्त असल्यामुळे भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे. शिखर धवन, भुवनेश्वर कुमार यांच्यानंतर विजय शंकर जखमी झाल्यामुळे विराट कोहलीच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र, विजय शंकर तंदुरुस्त असल्याचे बुमराहने गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
माझ्या चेंडूवर विजय शंकर दुखापतग्रस्त झाला हे खूप दुखःद होते. मात्र, आता काळजीचे कोणतेही कारण नाही. तो पूर्णपणे तंदुरुस्त असून पुढील सामन्यासाठी तयार आहे, असे बुमराहने पत्रकार परिषदेत सांगितले.
अफगाणिस्तानविरोधातील सामन्यापूर्वी सराव सत्रामध्ये विजय शंकरला दुखापत झाली होती. बुमराहचा एक यॉर्कर चेंडू शंकरच्या पायावर लागल्यामुळे सराव अर्ध्यावर सोडून तो माघारी परतला होता. विजय शंकर आता पूर्ण तंदुरुस्त असल्याची माहिती भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दिली आहे.