फलटणमध्ये पालखी तळाच्या स्वच्छतेसाठी झटले हजारो हात
फलटण – हजारो विद्यार्थ्यांसह फलटणकर नागरिकांनी कचरा उचलून पालखी तळ स्वच्छ केला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यानंतर शहरासह पालखी तळावर निर्माण झालेली अस्वच्छता दूर करुन शहरातील प्रदूषित व घाणीचे वातावरण बदलण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही यावर उपाययोजना म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने फलटण नगर परिषद फलटण, फलटण पंचायत समिती, फलटण, श्रीराम सहकारी साखर कारखाना मार्केट कमिटी श्रीमंत मालोजीराजे बॅंक श्रीमंत सईबाई पतसंस्था फलटण एज्युकेशन सोसायटी तसेच फलटण तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व फलटण शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत सालाबाद प्रमाणे पालखी तळ (विमानतळ) स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यातील माउलींच्या रथापुढे 27 आणि रथामागे असणाऱ्या 200 हून अधिक दिंड्यामध्ये सुमारे सव्वा ते दीड लाख वारकरी असून त्याशिवाय अन्य दिंड्यातून चालणारे वारकरी आणि भाविकांची संख्या सुमारे तेवढीच आहे. त्याशिवाय माउलींच्या दर्शनासाठी फलटण व परिसरातून येणारे भाविक असा सुमारे 3 ते 4 लाख लोकांचा राबता एक दिवसभर शहरात राहिल्याने शहरातील आरोग्य, पाणी, वीज, सुरक्षा आदी सर्वच यंत्रणावर प्रचंड ताण येत असतो.
त्यातून निर्माण होणारी अस्वच्छता शहराच्या आरोग्याला बाधा पोहोचविणारी ठरत असल्याने संजीवराजे नाईक निंबाळकर गेल्या 9 वर्षापासून पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ झाल्यानंतर शहर व पालखी तळवरील स्वच्छतेसाठी खास मोहीम आखून त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन शहरातील स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, तरुण मंडळे, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांना करतात. त्यांच्या आवाहनानुसार ही सर्व मंडळी या अभियानात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.
या स्वच्छता अभियानामध्ये नगराध्यक्षा सौ. नीताताई मिलिंद नेवसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस फलटणचे शहराध्यक्ष मिलिंद राजाराम नेवसे, आरोग्य समितींचे सभापती अजय माळवे, नगरसेविका वैशालीताई चोरमले प्रगतीताई कापसे सुधीर अहिवळे, तेजसिंह भोसले, माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, जिल्हा परिषदचे सदस्य दत्ता अनपट, व्यंकटेश देशपांडे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक-विद्यार्थी, पालिकेचे अधिकारी-कर्मचारी नागरीक उपस्थित होते.