कोल्हापूरप्रमाणे सातारा जिल्ह्यातही उपक्रमाची गरज
उमेश सुतार
कराड – वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. एका घटनेचा उलगडा होण्याअगोदर दुसरी चोरीची घटना घडत आहे. त्यामुळे तपासकामात दिरंगाई होत आहे. वाढत्या वाहन चोरीच्या घटनांचा पोलीस यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यावर उपाय म्हणून गावातील सर्व वाहनांची माहिती संबंधित गावाच्या पोलीस पाटील यांनी पोलीस ठाण्यांना द्यावी, अशा प्रकारच्या आदेशाचा अवलंब कोल्हापूर प्रमाणे सातारा जिल्ह्यातही झाल्यास पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. यादृष्टीने पोलीस अधीक्षकांनी अशाप्रकारचे आदेश काढण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्याच्या धकाधकीच्या युगात दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांची वाढती संख्या व या वाहन चोरीचे वाढत्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
चोरीतील वाहने ग्रामीण, दुर्गम भागात, खेडोपाड्यात विकली जातात. विशेष म्हणजे वाहने कमी पैशात मिळत असल्याने वाहनांची कागदपत्रे न पाहता कित्येकजण चोरीची वाहने बिनधास्तपणे विकत घेतात. त्यांना आपण चोरीचे वाहन विकत घेतल्याची कल्पनाही नसते. परिणामी, अनेकांची फसवणूक होते आणि कित्येकदा नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे चोरीचा तपास सुलभरीत्या करता यावा, या हेतूने कोल्हापूर जिल्ह्यात ही संकल्पना राबविली जात असून वाहनधारकांनी गावाच्या पोलीस पाटील यांच्याकडे आपल्या वाहनांची माहिती द्यावयाची आहे.
पोलीस पाटील यांनी त्यांच्याकडील माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे देणे सक्तीचे करण्यात आले आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी, अवजड वाहनांची व बेवारस वाहनांची माहिती देताना संबंधित वाहन मालकाचे नाव, वाहनाचा क्रमांक, चेसिस व इंजिन क्रमांक शिवाय, आरसी बुक, स्मार्ट कार्ड आधी मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्स अशी ही सर्व माहिती पोलीस पाटील यांच्याकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून ही माहिती दर महिन्याला अद्ययावत करण्यात येणार आहे. पोलीस पाटलांनी या कामात कसूर करता कामा नये, या बाबत गावातून दवंडी देण्यात यावी, असेही आदेश देण्यात आले आहेत. याच धर्तीवर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यात अशाप्रकारचा उपक्रम राबविल्यास पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
वाहन चोरीचे व फसवणुकीचे प्रकार होत आहेत. यासाठी प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. कोणी संशयित इसमाबाबत शंका वाटल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधला पाहिजे. चोरीचे प्रकाराला आळा घालण्यासाठी गावागावांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे.
अजय गोरड, साहाय्यक पोलीस निरीक्षक, उंब्रज.