करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसचा आणि तगडी स्टार कास्ट असणारा “कलंक’हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. हा चित्रपट फ्लॉप झाल्याने यातील कलाकारांसाठी हा सर्वात मोठा झटका तर होताच त्याच बरोबर हा त्यांच्या कारकिर्दीवरील एक कलंक म्हणून पाहिला जाऊ लागला आहे. मात्र, या चित्रपटात भुमिका साकारणाऱ्या एकाही कलाकाराने अद्याप प्रतिक्रीया दिली नव्हती. मात्र, वरुण धवनने या विषयी प्रथमच प्रतिक्रीया दिली आहे. या अपयशाचा परिणाम आपल्यावर झाल्याचे वरुणने म्हटले आहे.
2012 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या वरुणचे आतापर्यंतचे 11 चित्रपट हिट ठरले. मात्र “कलंक’ हा त्याचा पहिलाच फ्लॉप सिनेमा ठरला आहे. त्या विषयी बोलताना तो म्हणाला की, “मला अपयशाचा फार त्रास झाला. प्रेक्षकांना जर चित्रपट आवडला नाही तर तो साहजिकच चांगली कमाई करू शकणार नाही. माझ्यासाठी हा एक धडा होता. त्यातून मी बरंच काही शिकलो,’
याविषयी पुढे तो म्हणाला, “कधी कधी काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. आयुष्यात पहिल्यांदाच मी अपयशाला सामोर जात होतो आणि त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला. पण एका अर्थाने हे चांगलंच झाल. मला त्यातूनही खूप काही शिकायला मिळाले.’