हे मोदी सरकारचे राजनैतिक अपयश – कॉंग्रेसचा आरोप
नवी दिल्ली – अमेरिकेने भारताला इराणकडून तेल आयात करण्याची मुदत वाढवून देण्यास नकार दिला आहे. त्याचा भारतावर मोठा विपरीत परिणाम होणार असून मोदी सरकारच्या आर्थिक आणि राजनैतिक धोरणाचेच हे फलीत आहे असा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे. मोदींनी तेल कंपन्यांना 23 मे पर्यंत इंधनाच्या किंमती न वाढवण्याची सुचना केली आहे. केवळ मतदानावर डोळा ठेऊनच त्यांनी हा आदेश दिला आहे असा आरोपही कॉंग्रेसने केला आहे.
अमेरिकेने इराणवर आर्थिक बंदी घातली आहे. त्यामुळे या देशाकडून तेल आयात करणाऱ्या देशांना ही आयात बंद करण्याची सुचना अमेरिकेने भारतासह अन्य देशांना केली आहे. ही सुचना धुडकाऊनही जर भारताने तेल आयात सुरू ठेवली तर भारतावरही बंदी घालण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. हे भारत सरकाच्या राजनैतिक प्रयत्नांचेच अपयश आहे असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे.
सध्याच कच्चा तेलाच्या किंमती वाढत आहेत आणि भारतीय रूपयाचे डॉलरच्या तुलनेत मोठे अवमुल्यन होत आहे. या पार्श्वभूमीवर इराणकडून तेल आयात करण्यास बंदी आली तर त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा विपरीत परिणाम होणार आहे त्याकडे मोदी सरकारचे लक्ष नाही असे कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे. देशापुढे इतके मोठे इंधन आव्हान निर्माण झाले असताना मोदी मूग गिळून गप्प आहेत त्याचे कारण काय असा सवालही सुर्जेवाला यांनी उपस्थित केला आहे.