13 हजारांहून अधिक जणांनी घेतला लाभ ः 24 कोटींचा खर्च
पुणे – खासगी वैद्यकीय उपचार सर्वसामान्यांच्या अवाक्या बाहेर गेले आहे; पण महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली “शहरी गरीब’ योजना सामान्यांसाठी वरदान ठरत आहे. मागील वर्षी या योजनेचा लाभ 13 हजार 373 नागरिकांनी घेतला आहे. त्यासाठी सुमारे 24 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. तर मागील वर्षी कॅन्सर तसेच डायलेसिसच्या उपचारासाठी पालिकेकडून 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जात आहे.
शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील कुटुंबांसाठी महापालिकेकडून “शहरी गरीब’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महापालिकेकडून 1 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना वैद्यकीय उपचारासाठी 1 लाख रूपयांची मदत दिली जाते. तर मागील वर्षी कॅन्सर, किडनी तसेच इतर काही गंभीर आजारांसाठी 2 लाखा पर्यंत अनुदान दिले जाते. या अनुदानात औषधे तसेच उपचारांचाही समावेश असून त्यासाठी महापालिकेने शहरातील रुग्णालयांचे पॅनेल निश्चित केले असून या रुग्णालयांमध्ये ही उपचाराची सवलत मिळते. 2010 पासून या योजनेअंतर्गत सुमारे 82 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून जवळपास 62 हजार नागरिक तसेच कुटुंबीयांना या योजनेतून उपचार मिळाले आहेत.
खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी आर्थिक लूट सुरू असते. ही बाब महापालिकेच्या लक्षात आल्यानंतर शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील कुटुंबीयांसाठी शहरी गरीब योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वसामान्य रुग्णांना रुग्णालयात दर्जेदार उपचार मिळत आहेत. 2010 पासून ही योजना सुरू करण्यात आली असून या योजनेला 9 वर्षे झाली आहे. या योजनेचा 9 वर्षात अनेकांनी लाभ घेतला आहे. ही योजना सर्वसामान्यांना परवडणारी असल्याने नागरिकांचा या योजनेचा लाभ घेण्याकडे कल जास्त आहे. शहरी गरीब योजनेमुळे अनेक रुग्णांचे जीव वाचले आहेत.
कॅन्सरच्या रुग्णांना योजना फायदेशीर
या योजनेअंतर्गत महापालिकेला 2009-10 मध्ये सुमारे 1 कोटी रूपयांचा खर्च आला होता. हा खर्च 2018-19 मध्ये तब्बल 24 कोटी रूपयांवर पोहोचला आहे. या योजनेमुळे चांगले उपचार घेणे शक्य असल्याने आर्थिक गरजूंकडून पालिकेच्या या सेवेचा लाभ घेतला जात आहे. 2010 मध्ये या योजने अंतर्गत सुमारे 4642 कार्डधारकांची नोंदणी करण्यात आली होती. त्यातील 613 जणांनी उपचार घेतले होते. तर 2018-19 मध्ये सुमारे 15 हजार 314 कार्डधारकांची नोंदणी करण्यात आली असून त्यातील 13 हजार 373 जणांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. या रूग्णांमध्ये सुमारे 303 डायलेसिस सुरू असलेले रूग्ण असून 149 रूग्णांवर जिवघेण्या कॅन्सरची किमोथेरेपी सुरू आहे.