इस्लामाबाद – भारताने सीमावर्ती भागातील हवाईदलांच्या तळावरील लढाऊ विमाने काढून घेई पर्यंत आम्ही आमची हवाई हद्द भारतीय विमानांसाठी खुली करणार नाही अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. भारताने बालाकोट येथे हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने 26 फेब्रुवारी रोजी आपली हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केली आहे. ही बंदी अजूनही सुरूच आहे.
पाकिस्तानच्या नागरी हवाई वाहतूक विभागाचे महासंचालक नुसरत यांनी पाकिस्तानी संसदेच्या स्थायी समितीपुढे बोलताना हीं माहिती दिली. पाकिस्तानने आपली हवाई हद्द खुली करावी अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती. त्यावेळी भारताला ही सुचना करण्यात आली आहे असे त्यांनी नमूद केले.
पाकने ही बंदी घातल्यानंतर भारताची सारी प्रवासी विमाने पर्यायी मार्गाने अन्यत्र नेली जात आहेत. भारताने मात्र पाकिस्तानी विमानांसाठी आपली हवाई हद्द खुली केल्याचा दावा केला आहे पण पाकिस्तानने तो अमान्य केला.