अभिव्यक्तिस्वातंत्र्य आचारसंहितेच्या काळात अबाधित
नवी दिल्ली – आचारसंहितेने नागरिकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येत नाही हे विरोधकांना कधी कळणार, असा सवाल विचारात केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी वारंवार निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या विरोधी पक्षांची खिल्ली उडवली. आचारसंहितेच्या बाबतीत कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचे वर्तन चिडचिड्या मुलासारखे आहे. त्यांनी अशा प्रकारे लहान मुलांसारखे रडू नये अशी टीका जेटली यांनी केली आहे.
कॉंग्रेस वारंवार आईवडिलांकडे इतरांची तक्रार करणाऱ्या मुलाप्रमाणे ऊठसूठ पंतप्रधानांच्या विरोधातील तक्रार घेऊन निवडणूक आयोगाकडे जात आहे. कॉंग्रेससारख्या मोठ्या आणि जुन्या पक्षासाठी हा प्रकार शोभनीय नाही.
आचारसंहितेची तक्रार करताना निवडणूक आयोगासारख्या संस्थेवर अविश्वास दाखवणे लोकशाहीला मारकच ठरणारे आहे. देशातील नागरिकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर कुणीही गदा आणू शकत नाही. मग ती आचारसंहिता असो, सर्वोच्च न्यायालय असो अथवा देशाची संसद, असेही जेटली म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेत प्रत्येक भाषणांवर कॉंग्रेससह विरोधी पक्ष उठसूठ निवडणूक आयोगाकडे तक्रार करतात हा प्रकार योग्य नाही. असे सांगून जेटली म्हणाले, मोदी यांनी मत देताना शहीद जवानांच्या हौतात्म्याची आठवण ठेवा असे म्हटले तरी विरोधक वेळीवेळी तक्रार करतात.