क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लंडनमधील लॉर्डस मैदानावर नुकताच विश्वचषकाचा फायनल सामना पार पडला. कमालीचा अटीतटीचा ठरलेला ‘फायनल’ सामना एकदा नव्हे तर दोन वेळा टाय झाला आणि शेवट ‘नियमाप्रमाणे’ विश्वविजेतेपदाची माळ इंग्लंडच्या गळ्यात पडली. विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यांमधील भारतीय संघाची लाजवाब कामगिरी, रोहित शर्माची धडाकेबाज फलंदाजी, उपांत्य फेरीमध्ये निर्णायक क्षणी धोनीला धावबाद करणारा मॅक्सवेलचा थ्रो आणि अंतिम सामन्यात मॅक्सवेल धावबाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या काळजाचा चुकलेला ठोका! यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपमधील या आणि अशा अनेक अविस्मरणीय आठवणी क्रिकेट रसिकांच्या मनावर अगदी शिलालेखाप्रमाणे कोरल्या गेल्या आहेत. असेच मनावर ठळक छाप सोडून गेलेले या वर्ल्डकपमधील काही क्षण युफोरियाचे वाचक सांगतायेत.
वर्ल्डकपची फायनल जशी रंगतदार व्हायला हवी होती, तशीच क्रीडा रसिकांना पाहायला मिळाली. या वर्ल्डकपमधील सर्वांत अविस्मरणीय क्षण असेल तर, तो फायनलचा इंग्लड व न्यूझीलंड यांच्यातील क्रिकेटचा अंतिम सामना. हा सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये देखील टाय झाला. आजपर्यंत अशा प्रकारचा प्रसंग कोणत्याही वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पाहावयास मिळाला नाही. तो क्षण व प्रसंग पाहावयास मिळाला. खरे पाहता उभय देश हे वर्ल्डकप विजेते आहेत. त्यांच्यातील अंतिम सामना अविस्मरणीय होता.
– गोरख ठाकरे
आयसीसी वर्ल्डकपमध्ये खेळाडू ज्याप्रकारे खेळत होते व जो काही खेळ प्रदर्शित केला ते पाहून क्रिकेट चाहत्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे माझ्या मते, टीममध्ये एकमत नव्हते त्यामुळे जिंकत असलेली मॅच हरली आहे. माझ्या मते, खेळाडूंत सध्या तरी एकमत नाही आणि माझा अविस्मरणीय क्षण तोच आहे जेव्हा धोनी रनआऊट झाला व जिंकत असलेली मॅच हरलो.
– रेणुका पवार
क्रिकेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता खेळ. दर चार वर्षांनी वर्ल्डकपचा सामना होत असतो, या वर्ल्डकपमधील अविस्मरणीय क्षण म्हणजे रवींद्र जडेजा हा न्यूझीलंडच्या सामन्यात उत्तम खेळला. तसेच रोहित शर्माने सामन्यात 5 शतके केली. धोनीचे संघ नियोजन उत्तम फक्त त्याचा सेवानिवृत्तीचा निर्णय चुकीचा वाटला त्याने निवृत्ती घेऊ नये. सर्व कामे विसरून क्रिकेट पाहणे हा एक छंद आहे.
– संतोष जंगम
अखेर जे न व्हायचे तेच झाले. अघटित घटले. क्षणात होत्याचे नव्हते झाले अन् आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आपला संघ विजेतेपदासाठी फेवरिट होता. आपल्या संघानेही प्राथमिक फेरीत एकापेक्षा एक धडाकेबाज विजय मिळवत अपेक्षा उंचावल्या होत्या. अगदी न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील पहिल्या डावापर्यंत सारे काही सुरळीत चालले होते. पण फलंदाजीला सुरुवात झाली आणि पहिल्या अर्ध्या-पाऊण तासातच होत्याचे नव्हते झाले. खरं सांगायचं तर न्यूझीलंडला सहज नमवू हा अतिआत्मविश्वास आपल्या संघाला नडला. न्यूझीलंडला अवघ्या 239 धावांत रोखल्यानंतर फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी आधी 240 धावांचा पल्ला गाठावा लागेल हेच त्यांच्या ध्यानी राहिले नसावे. पुढे 6 बाद 92 अशा केविलवाण्या स्थितीत सापडलेल्या संघाला रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनीने एक अशक्यप्राय विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले.
– उर्मिला तोरकडे
या स्पर्धेत भारतीय टीमचा परफॉर्मन्स खूप चांगला होता; परंतु सेमीफायनलमधील त्यांचा चेस करण्याचा जो प्रयत्न होता तो चांगला नव्हता. कारण ते समोरील टीमला कमजोर समजून खेळायला गेले व त्यांना त्यात हार पत्करावी लागली यावरून एक अंदाज येतो की समोरच्याला कधीही कमजोर समजू नये व आपला खेळ सर्वांबरोबर सारखाच असला पाहिजे तसेच मधल्या फळीने खूप निराशा केली. एकही प्लेअर नीट खेळला नाही. त्यांनी पहिल्या प्लेयर्सना साथ द्यायला हवी होती. कारण हे टीम वर्क होतं. त्यामुळे आपल्या तोंडातला घास हिसकावून घेतल्यासारखे वाटले. सर्वांनी एकमेकांना साथ देऊन खेळ खेळला पाहिजे.
– धीरज सोनावणे
तसं तर क्रिकेट वर्ल्डकप म्हटलं की हा एक सणच असतो. हिटमॅनची पाच शतकं, कोहली रन मशीन, मास्टरमाइंड बुमराह या सर्वांमध्ये आठवण मात्र एकच आणि ती म्हणजे धोनीे रनआउट. धोनी आउट झाला आणि वर्ल्डकप हातातून गेल्याचा भास झाला. चिडचिड झाली आणि कोणीतरी मनाला हर्ट केल्यासारखं झालं.
– रोहित डुंबरे