सोमाटणे – पवन मावळ परिसरात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्याचा फायदा घेत शेतकरी आधुनिक पद्धतीने लागवड करण्यास सज्ज झाले आहेत. पवन मावळातील सडवली येथे चारसूत्री भात लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. सडवली येथे सहाययक कृषी अधिकारी अश्विनी खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतशील शेतकरी अरुण दत्तात्रय बदर यांच्या शेतात चारसूत्री लागवड करण्यात आली. उर्से, बौर, सडवली, आढे, ओझर्डे या भागात यंदा 100 एकर क्षेत्रावर चारसूत्री करण्याचे उद्धिष्ट असल्याचे खंडागळे यांनी सांगितले.
समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी चारसूत्री पद्धतीने लागवड करण्यास सुरुवात केली आहे. तसेच युरिया ब्रिकेटचे गोळी खत ही खरेदी केल्या आहेत.चारसूत्री पद्धतीने भात लागवड व युरिया ब्रिकेटची गोळ्या चार चुडामध्ये एक गोळी अशा प्रकारे लागवडीनंतर दोन दिवसांत लावली असल्याने भाताच्या उत्पादनात वाढ होणार आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
या पद्धतीमध्ये भात खाचरात प्रामुख्याने पिकाच्या अवशेषाचा फेरवापर करण्यात येतो. गिरिपुष्प झाडाच्या हिरव्या पाल्याचा खत म्हणून चिखलणीच्या वेळी वापर केला जातो. भाताच्या सुधारित जातीच्या रोपाची दोरीच्या सहाय्याने 15 बाय 25 सें. मी. अंतरावर नियंत्रित लावणी करण्यात येते. त्यासाठी खुणा केलेली नायलॉन दोरी वापरण्यात येते, युरिया आणि डीएपी यांच्या मिश्रणातून तयार केलेल्या ब्रिकेट्स लावण्यात येतात.
– अश्विनी खंडागळे, कृषी सहाय्यक, उर्सेचारसूत्री पद्धतीत भात रोपे कमी लागत असून, भात लावणीस कमी वेळ लागतो. बियाणे खर्च ही कमी येतो, युरिया ब्रिकेट खोल खोचल्यामुळे जमिनीच्या पृष्ठ भागाच्या वरील तणाचा प्रादुर्भाव कमी होतो. विशेष म्हणजे खर्चामध्ये 30 टक्के बचत होते, किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. आणि पर्यायाने भाताच्या उत्पादनात 3 ते 4 पट भरघोस वाढ होते, तरी सर्व शेतकऱ्यांनी चारसूत्री पद्धतीचा अवलंब करावा.
– अरुण बदर, प्रगतशील शेतकरी, सडवली.