कोल्हापूर – आपल्या कुटुंबातील सदस्यांचा तीव्र विरोधाला न जुमानता निव्वळ गोकूळसाठीच महाडिकांनी आपले कुटूंब पणाला लावले आणि मुन्ना महाडिकांचे राजकीय भवितव्यच धोक्यात आणले आहे, असा गौप्यस्फोट पालकमंत्री भाजपा नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकार गोकूळ मल्टीस्टेट होण्यासाठी आपला “ना-हरकत’ दाखला (एन.ओ.सी.) देणार नाही. त्यामुळे त्यांचे हे दिवा स्वप्नच राहिल, आणि त्यांचे राजकीय अस्तीत्वच संपून जाईल, असेही पाटील म्हणाले. प्रचाराच्या अंतिम टप्यात पाटील यांनी आज धावता दौरा केला.
सकाळच्या राजारामपुरीतील पदयात्रेच्या समारोपात आणि त्या पाठोपाठ झालेल्या मंगळवारपेठ, शिवाजीपेठ, रंकाळा तलाव, नष्टे इस्टेट आणि सदरबाझार येथील कार्यकर्त्यांच्या आणि मंडल पदाधिकारी व हितचिंतकांच्या मेळाव्यात त्यांनी आक्रमकपणे आपली भुमिका मांडली. आपला पराभव दिसत असल्याने महाडिक आता अफवा आणि गैरसमज निर्माण करून काठावरच्या मतदारांच्यात मानसिक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे पाटील म्हणाले.
देशात तब्बल 25 वर्षानंतर पुर्ण बहुमताचे मोदींचे सरकार आले आहे. त्यामुळेच ऐतिहासिक यशस्वी “सर्जिकल स्ट्राईक’सह अनेक जागतिक पातळीवरील विरोधकांना धडकी भरवणारे अनेक निर्णय ठामपणे मोदी सरकार घेऊ शकले आहे. भारतात भक्कम असे “मजबुत’ नव्हेतर काठावरच्या बहुमताचे लेचेपेचे “मजबूर’ सरकार यावे यासाठी अमेरिका पाकिस्तान पासून अनेक देश सक्रीय आहेत. मात्र त्यांचा हा मनसुबा उधळून लावण्यासाठी आगामी पाच वर्षातील प्रचंड बहुमताचे सरकार पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्लीत स्थापन होणे गरजेचे आहे. त्यासाठीच कोल्हापूरातून भाजपा बरोबर युतीत असलेल्या शिवसेनेच्या प्रा. संजय मंडलिक यांना विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
लोकसभेच्या निवडणूका या व्यक्तीपेक्षा पक्ष आणि देश सुरक्षेसह राष्ट्रीय विषयावरच होत असतात, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पासून अनेकजण यासाठी आग्रही होते. भारतीय जनता पक्ष याच केंद्रीय विचारांनी लोकसभा निवडणूकांना नेहमी सामोरा गेला आहे. आणि कोणतेही व्यक्तीगत टीका टिप्पणी न करता या निवडणूका व्हाव्यात असा आमचा आग्रह राहिलेला आहे. पण विरोधक महाडीक आता अगदीच केविलवाणे असे व्यक्तीगत आरोप करत आहेत. अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली.
सोशल मिडीयावरून महाडिकांचे मोदींसाठी पाठिंब्याचे मेसेज…
सोशल मिडीयावरुन आता तर अनेक अनपेक्षित असे प्रचाराचे नमुने पुढे येत आहेत. खुद्द महाडिकांकडूनच मोदींची देशाला गरज आहे, तशीच कोल्हापूरचे प्रश्न त्यांच्या समोर मांडण्यासाठी आमची गरज आहे अशा आशयाचे मेसेज फिरत आहेत. ते चंद्रकांत पाटील यांनी वाचून दाखवले. देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी बहुमतातील पक्ष गरजेचा असतो दुहेरी आकड्यातील खासदार नसणाऱ्या राष्ट्रवादीचा प्रतिनीधी निव्वळ प्रश्न मांडण्याशिवाय कांही करु शकत नाही, त्यासाठीच भाजपाचे नैसर्गिक साथीदार असलेल्या शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक हेच यासाठीच मोलाची भूमिका निभावू शकतात, असेही त्यांनी सांगितले.