पणन मंडळ, महापालिकेत समन्वयाचा अभाव
पुणे – शेतकऱ्यांच्या नावाखाली भरविल्या जाणाऱ्या आठवडे बाजारात मार्केटयार्डातून भाजीपाला खरेदी करून स्थानिक नागरिकच त्याची विक्री करत असल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी पणनमंडळ आणि महापालिकेकडून संयुक्त बैठक घेऊन या बाजारांची तपासणी तसेच अशा अनधिकृत बाजारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ही कारवाई बारगळली असून अतिक्रमण विभागाकडे पुन्हा अशा तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे.
महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही वर्षांत आठवडे बाजारांचे पेव फुटले आहेत. हे बाजार महापालिकेच्या जागेत भरत असून महापालिकेची कोणतीही मान्यता न घेता ते रस्त्यावर तसेच रिकाम्या जागेत भरविले जात आहेत. तसेच या बाजारात शेतकऱ्यांना संधी देणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात काही स्थानिक भाजीवालेच मार्केटयार्डातून भाजीपाला आणि ग्राहकांना चढ्या दराने विकत आहेत. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे पालिकेच्याच जागेत भरविल्या जाणाऱ्या या बाजारात लावल्या जाणाऱ्या स्टॉलचे भाडे बाजार भरविणाऱ्या संयोजकांकडून बेकायदेशीरपणे वसूल केले जात आहे.
याबाबत महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिकेने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यातील पणन मंडळ तसेच महापालिकेने मान्यता दिलेले बाजार कोणते याची कोणतीही माहिती नसल्याने पणन मंडळास पत्र पाठवून याबाबत बैठक घेण्यात आली. तसेच, दोन्ही विभागाच्या माध्यमातून अशा बाजारांची तपासणी करून त्यांना अधिकृत दर्जा देणे शक्य असल्यास त्यासाठी संधी देणे तसेच शक्य नसल्यास अशा बाजारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यानंतर याबाबत काहीच झालेले नाही. त्यामुळे शहरात गेल्या काही महिन्यांत पुन्हा नव्याने रस्त्यावर अतिक्रमण करून आठवडे बाजार भरत असून पालिकेच्या जागेचा बेकायदेशीर वापर करून शेतकरी तसेच विक्रेत्यांकडून पैसे वसूल करण्याचे प्रमाण वाढले आहे.