पुणे: “उद्धव ठाकरे म्हणतात की पवारांनी मैदान सोडलं. मी अनेक निवडणुका पाहिल्या. १४ निवडणुका जिंकल्या. एकदा मैदानात येऊन दाखवा. मी लढण्याची गरज पडणार नाही, आमचे इतर पहिलवानच तुम्हाला भारी पडतील. ठाकरेंनी मैदानाबाबत बोलू नये. ज्यांनी कधी मैदान पहिलं नाही, त्यांच्या तोंडी मैदानाची भाषा शोभत नाही.”
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विशेष समाचार घेताना मंचर येथे एका विराट सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बोलत होते. आज संयुक्त महाआघाडीचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ते आले होते.
शरद पवार आपला टीकेचा सूर धरून ठेवत पुढे म्हणाले, “फडणवीस आणि यांनी कधी शेतकऱ्यांसाठी काम केलं नाही. कामगारांसाठी काम केलं नाही. फक्त सत्ता हाती घेतली आणि त्या सत्तेचा काय भरण्यासाठी वापर केला ते मी जाहीर बोलू इच्छित नाही.
गप्पा मारणारे बरेच लोक आहेत. पुण्यात विमानतळ झाले असते तर आज खूप काही झालं असतं. शेतीमाल थेट परदेशी गेला असता. या भागातील खासदारांनी त्याला विरोध केला. खासदारांच्या दुटप्पी भूमिकेमुळे विमानतळ झाले नाही. हे असे खासदार आपल्याला हवेत तरी कशाला? म्हणून आम्ही डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली. अमोल कोल्हे यांनी या भागाच्या विकासासाठी खूप स्वप्न बघितली आहेत. ते स्वप्न साकार करण्यासाठी अमोल कोल्हे यांना लोकसभेत पाठवा.”