जम्मू -पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचा भंग करत भारतीय हद्दीत गोळीबार केला. त्या माऱ्यात भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी झाले. ती घटना शुक्रवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात घडली.
पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत असणाऱ्या नौशेरा क्षेत्रात भारतीय सीमा नाक्याला लक्ष्य केले. त्यांनी तोफगोळ्यांचाही मारा केला. त्या माऱ्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी माऱ्यात जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी तातडीने लष्करी रूग्णालयात हलवण्यात आले. पाकिस्तानी सैनिक सातत्याने कुरापती काढून भारतीय हद्दीत मारा करतात.
त्या आगळिकीला जबर प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. ताज्या घटनेत भारतीय लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी बाजूची किती हानी झाली ते तातडीने समजू शकले नाही.