नवी दिल्ली – खोटी बिले व खोटी कागदपत्रे सादर करून रेल्वे खात्याची सुमारे 2 कोटी 20 लाख रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचे एक प्रकरण सिकंदराबाद येथे उघडकीला आले आहे. या प्रकरणी सीबीआयने रेल्वेचा एक अधिकारी आणि अन्य तीन कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. व्ही गणेश असे यात गुन्हा दाखल झालेल्या रेल्वेच्या अधिकाऱ्याचे नाव असून तो तेथे अकाऊंट असिस्टंट म्हणून काम करतो.
साई बालाजी फार्मा ऍन्ड सर्जिकल, विनायक एजन्सीज, आणि श्री थिरूमला एन्टरप्राईजेस अशी फसवणूक करणाऱ्या तीन कंपन्यांची नावे आहेत. रेल्वेच्या हिशोब तपासण्याच्यावेळी या सर्वांनी संगनमत करून 31 बोगस बिले सादर करून ही फसवणूक केल्याचे लक्षात आले. ऑक्टोबर 2018 ते एपिल 2019 या काळात त्यांनी ही बिले सादर करून रेल्वेकडून पैसे वसुली केली होती. त्या बिलांना जीएसटी नंबर नव्हते. गणेश याने ही बिले मंजूर करून त्याचे पैसे या तीन कंपन्यांच्या नावे एक्सिस बॅंकेत उघडण्यात आलेल्या खात्यांमध्ये भरले होते.
या प्रकरणात दक्षिण रेल्वेच्या आणखीही काहीं अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय असून सीबीआयकडून त्यांचीही चौकशी सुरू आहे. त्यामुळे आणखीही काही अधिकारी या जाळ्यात सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.