राहुरी: संजय गांधी निराधार योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थींना लाभ मिळण्यासाठी कामगार तलाठ्यांना इष्टांक द्यावा. हे आदेश देत या लाभार्थीसाठी असलेली 21 हजार रूपये उत्पन्नाची अट 50 हजार रुपयांपर्यंत असावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही आमदार शिवाजी कर्डीले यांनी दिली. राहुरी तहसील कार्यालयातील आयोजित संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला तहसीलदार एफ.आर. शेख, नायब तहसीलदार गणेश तळेकर, संजय गांधी निराधार योजनेचे डमाळे, पुरवठा अधिकारी डी.डी.गाडे, अव्वल कारकुन जाधव, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य लतिका गोपाळे, अतिक बागवान, विजय कानडे, समीर पठाण, निसार शेख, गणेश खैरे, अफनान आतार उपस्थित होते. आमदार कर्डिले म्हणाले, शासनाच्या योजनेचा तळागाळातील लोकांपर्यत लाभ मिळण्यासाठी प्रत्यक्षात जावून याबाबत माहिती द्यावी. योजनाच्या अंमलबजावणीसाठी सर्कल, तलाठी, गटविकास अधिकारी यांची तातडीने बैठक घेण्याचे आदेश आमदार कर्डिले यांनी तहसीलदार शेख यांना दिले.
या बैठकीत 12 निराधार महिलांना शासनाच्या वतीने अर्थसहाय्य म्हणून प्रत्येकी 20 हजार रूपयाचे धनादेश आमदार कर्डीले यांच्या हस्ते देण्यात आला. तर श्रावणबाळ सेवा योजनेचे 48 प्रकरणे, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजनेचे 7 प्रकरणे मंजूर झाल्याची माहिती या योजनेचे अधिकारी सी. वाय. डमाळे यांनी दिली. तहसीलदार एफ. आर. शेख म्हणाले, शिलेगाव, कोंढवड, बारागाव नांदुर येथे जळीत घटना घडल्यानंतर शासनाची मदत करण्यात आली आहे. बारागाव नांदुर येथील झोपड्यांना आग लागुन दोन चिमुरड्या मुलींचा दुदैवी अंत झाला होता. आ. कर्डीले यांच्या सुचनेनुसार मयत दोन मुलींच्या कुटुंबास तातडीची आठ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.