मउ, (उत्तर प्रदेश) – कोलकातामध्ये जेथे तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांनी इश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली, तेथेच विद्यासागर यांचा पंचधातूचा भव्य नवीन पुतळा उभारण्यात येईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. पश्चिम बंगालमध्ये डमडम येथे सभेसाठी जायला हेलिकॉप्टर उतरायला परवानगी ममता बॅनर्जी देतील का नाही, याची शाश्वतीही वाटत नसल्याची शंका त्यांनी बोलून दाखवली.
दीदींचा स्वभाव आपण दीर्घकाळापासून अनुभवत आहोत. आता तर देशानेही त्यांचा स्वभाव बघितला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांनीच केली आहे. या कृत्यात सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा केली जाईल आणि पूर्वीच्याच ठिकाणी पंचधातूचा नवीन भव्य पुतळा उभारला जाईल, असे मोदी म्हणाले.
मंगळवारी अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान मोठी तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. याच हिंसाचरादरम्यान ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याचीही तोडफोड झाली. ही अराजकता तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडूनच पसरवली गेली. कूचबेहारमध्ये माझ्या सभेच्या मंचाच्या जागेवर ममता दीदींनी आपल्या सभेसाठी भव्य मंच उभारला. पश्चिम मिदनापूर आणि ठाकूरनगर येथील आगोदरच्या सभांदरम्यानही हीच स्थिती कायम होती. डमडम येथील सभेसाठी हेलिकॉप्टर उतरायलाही त्यांनी परवानगी दिली नसती, असेही ते म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये उत्तर प्रदेश, बिहारी आणि पूर्वांचलातील नागरिकांना लक्ष्य केले जाते आहे. त्याबाबत बहेनजी (मायावती) काही उत्तर देतील, असे वाटले होते. पण त्यांना सत्तेची जास्त काळजी आहे. आज जी आघाडी “मोदी हटाव’ च्या घोषणा देत आहे, त्यांचे गणित चुकले आहे. ते आज निराश झालेले आहेत, असे मोदी म्हणाले.
सपा-बसपा दोन्ही पक्ष संधिसाधू आहेत. त्यांच्या नेत्यांनी आपापसात व्यवहार केला. पण कार्यकर्ते एकमेकांवर हल्लेच करत आहेत. एकत्र आल्यास मते वाढतील, हा त्यांचा अंदाज चुकला आहे. जातींना गृहित धरता येणार नाही, हे 2014 आणि 2017 मध्येही त्यांना समजले नव्हते आणि 2019 मध्येही त्यांना समजलेली नाही. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीच्या राज्यात कन्यांची काय स्थिती होती, हे सगळ्यांना माहित आहे. तर अल्वार येथील दलित कन्येवरील सामुहिक बलात्काराच्या प्रकरणी मायावतींच्या वर्तनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची टीका पंतप्रधानांनी केली.