नवी दिल्ली – तृणमुल कॉंग्रेसच्या खासदारांनी आज संसदेच्या आवारात इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रांच्या विरोधात निदर्शने केली. देशात यापुढे इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रांऐवजी मतदान पत्रिकांद्वारेच मतदान घेण्यात यावे यासाठी निवडणूक नियमावलीत आवश्यकती दुरूस्ती करावी अशी मागणी त्यांनी केली. लोकसभा निवडणुक निकलानंतरच या पक्षाने ईव्हीएमच्या विरोधात ही मोहीम सुरू केली आहे.
संसदेच्या आवारातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर जमून तृणमुल खासदारांनी ईव्हीएम विरोधात जोरदार निदर्शने करीत घोषणाबाजी केली. ईव्हीएमच्या वापराच्या संबंधात अनेक विसंगती पुढे आल्या आहेत त्या सर्व प्रकारांच्या अनुषंगाने सत्यशोधन समिती स्थापन करावी अशी मागणी तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी या आधीच केली आहे. हा विषय त्यांनी आता संसदेत लाऊन धरण्याचे ठरवले आहे.