उरुळी कांचन – कुंजीरवाडीतील पर्यावरण संरक्षण समितीच्या तरुणांनी मित्राच्या अस्थीरक्षा नदीत विसर्जित न करता त्या कुंजीरवाडीमध्ये वृक्ष लागवडीच्या खड्ड्यात विसर्जित केल्या. त्यामुळे “मरावे परी वृक्षरूपी उरावे, याची गावकऱ्यांना प्रचिती आली.
अमर कदम तरुणाचे नुकतेच अल्पशा आजाराने ससून रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. अमर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानासुद्धा गावातील तरुणांनी त्याला उपचारासाठी मदत स्वरूपात काही रक्कम गोळा करून त्याच्या कुटुंबीयांकडे दिली होती. अमर हा हृदयाच्या आजाराने लहानपणापासूनच आजारी होता. तरुणांबरोबर पर्यावरण संरक्षणाचे काम तो करू लागला. त्यामुळेच त्याची आठवण झाडाच्या स्वरूपात नेहमी समोर राहावी म्हणून पर्यावरण संरक्षण समितीच्या सर्व सभासद मित्रांनी त्याची अस्थीरक्षा नदीत विसर्जित न करता झाड लावून विसर्जित करून एक वेगळा उपक्रम राबविला.
यावेळी पर्यावरण संरक्षण समितीचे बाळासाहेब सावंत, हरिष गोठे, सतीश लंजवाडे, भाऊ झेंडे, संजय जगताप, संदीप शिवरकर, वामन हरगुडे, तुकाराम गावडे, कल्पेश सावंत यांसह सर्व सदस्य उपस्थित होते. पर्यावरण संरक्षण समितीच्या सदस्यांनी व अमरच्या कुटुंबीयांनी राबविलेल्या या उपक्रमाचे शिवसेनेचे हवेली तालुका संघटक स्वप्नील कुंजीर पाटील यांनी वृक्षरूपाने अमर नेहमी सर्वांच्यात राहिल, असे मत व्यक्त केले.केले.