पुणे – पर्यटन क्षेत्रांचा विकास व्हावा आणि त्या माध्यमातून पर्यटकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पर्यटकांचीही मते जाणून घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी महामंडळाच्या वतीने पर्यटकांना आवाहन करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांत पर्यटन विकास महामंडळाने आपल्या कारभारात आमूलाग्र बदल केला आहे. या बदलामुळे सर्व पर्यटकांना दर्जेदार सुविधा मिळत आहेत. विशेष म्हणजे देश आणि विदेशातून येणाऱ्या पर्यटकांनी आतापर्यंत महामंडळाच्या या सुविधांचे कौतुक केले आहे. त्यामुळे महामंडळाकडे पर्यटकांचा ओघ वाढत चालला आहे, त्यातूनच महामंडळाच्या पर्यटन ठिकाणांचे बुकिंग वेळेच्या आधीच फुल्ल होत आहे. परिणामी, पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यावर उपाय म्हणून महामंडळाच्या वतीने राज्यभरातील पर्यटनांच्या ठिकाणी खाजगी तत्वावर निवास आणि न्याहारी केंद्रे सुरु केली आहेत. त्यावर महामंडळाची नजर असल्याने त्याठिकाणचा दर्जा चांगला असून पर्यटकांना खाजगी हॉटेलच्या तुलनेत दर्जेदार सेवा मिळत आहे. त्यामुळे महामंडळाची सेवा आणखी लोकाभिमुख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.
पर्यटन स्थळांचा विकास करताना पर्यटकांची मते जाणून घेतल्यास हा विकास आणखी वेगाने आणि दर्जेदार करणे शक्य होणार आहे. त्यामुळेच पर्यटकांची मते महामंडळाच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरणार आहे, हा हेतू लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाला पाठविण्यात आला आहे, त्याला मान्यता मिळाल्यानंतर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येणार आहे अशी माहितीही हरणे यांनी दिली.