वंचित बहुजन आघाडीसह 15 उमेदवारांचे अर्ज दाखल
पिंपरी – मंगळवार (दि.9) रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मुख्य राजकीय पक्षाचे दोन्ही उमेदवार मंगळवारी अर्ज भरणार असून त्याची तयारी देखील सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार मंगळवारी रॅली काढून अर्ज भरणार आहेत. मावळ लोकसभेच्या आखाड्यात आता खऱ्या अर्थाने रंगत येऊ लागली असून सोमवार (दि.8) रोजी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांच्यासह 8 जणांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे, सोमवार पर्यंत एकूण 15 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
संपूर्ण राज्यात सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास दि. 2 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. 6 एप्रिल पर्यंत केवळ 7 उमेदवाराचे अर्ज आले होते. तर आज सोमवार दि 8 एप्रिल रोजी एकाच दिवसात 8 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. वचिंत बहुजन आघाडीचे राजाराम नारायण पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करीत आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबतच बहुजन समाज पार्टीचे संजय किसन कानडे, क्रांतीकारी जयहिंद सेनेचे आप्पा उर्फ जगदीश शामराव सोनवणे, अपक्ष म्हणून अमृता अभिजीत आपटे, भारतीय नवजवान सेनेचे प्रकाश भिवाजी महाडिक, अपक्ष म्हणून धर्मराज यशवंतराव तंतरपाळे, प्रकाश गणपत देशमुख, राकेश प्रभाकर चव्हाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवशी महायुती व आघाडीचे उमेदवार शक्तीप्रदर्शन करत रॅली काढुन अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांची दिवसभर तयारी सुरू होती.