मुंबई – महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेचा उद्या, दि. 27 जूनला निर्णय होणार आहे. तीन महिन्यांपूर्वी उभयपक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने राखून ठेवलेला निर्णय जाहीर करणार आहेत.
या याचिकेवर याचिकाकर्त्यांचा मुद्देसुद युक्तीवाद, राज्य सरकारच्या वतीने मातब्बर वकिलांची फौज, त्यांचा आरक्षणाच्या समर्थनार्थ झालेला जोरदार युक्तिवाद, हजारो पानांच्या नोंदी, राज्य मागास प्रवर्गाचा अहवाल आणि आजवरच्या इतर आयोगांनी यासंदर्भात सादर केलेली माहिती पाहता न्यायालय आरक्षणाबाबत काय निर्णय देणार आहे, याबाबत साऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्य सरकारने कायद्यात नव्याने दुरुस्ती करून मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. याला जयश्री गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीने ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या जनहित याचिकेसह सहा याचिका हायकोर्टात दाखल आहेत. त्यापैकी 4 विरोधात, तर 2 याचिका आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या आहेत. तर या याचिकेत हस्तक्षेप करणारे 22 अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या 16 अर्जाची सुनावणी न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर डिसेंबर महिन्यात सुनावणीला प्रारंभ झाला. गेले दीड महिने नियमित सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.