मुदतवाढ देऊनही अनेकांनी प्रवेश घेणे टाळले
पुणे – शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) पहिल्या फेरीत 45 हजार 548 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारी (दि.10) शेवटची मुदत आहे. पहिल्या फेरीत प्रवेशासाठी यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर अजूनही काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याचे दिसून येत आहे.
आरटीईची राज्यभरात ऑनलाइन सोडत काढण्यात आली. पहिल्याच सोडतीतून 67 हजार 706 विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश निश्चित करण्यात आले होते. एसएमएसद्वारे पालकांना प्रवेशाची माहिती देण्यात आली. पहिल्याच फेरीचे प्रवेश अजून सुरू आहेत. यासाठी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी “आरटीई’ प्रवेश घेतला नाही. त्यामुळे विद्यार्थी आरटीई अंतर्गत दुसऱ्या फेरीच्या सोडतीची प्रतीक्षा करीत आहेत.
दरम्यान, प्रवेश निश्चित होऊन काही शाळांकडून कागदपत्रांसाठी अडवणूक केली जात असल्याबाबत पालकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रवेश होऊ शकले नाहीत. उत्पन्नाच्या दाखल्यावरून पालकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केले जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
राज्यभरात एकाच वेळी आरटीई अंतर्गत प्रवेशप्रक्रिया होत आहे. आजमितीस 67 हजारपैकी 45 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरटीईचे सर्वात जास्त प्रवेश पुण्यात झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. पुण्यात 8 हजार 774 इतके प्रवेश झाले आहेत. प्रवेशप्रक्रिया संथगतीने सुरू होत असून उर्वरित फेरी कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.