मुंबई: शालेय विद्यार्थ्यांचे जीवन तंबाखूच्या विळख्यात नष्ट होउ नये यासाठी राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सलाम मुंबई फाउंडेशनची मदत घेण्यात येणार आहे. शाळेच्या शंभर यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे.
तंबाखूविरोधी संदेश शैक्षणिक संस्थेच्या स्टेशनरीवर लिहिण्यात येणार असून ते शाळांच्या वर्गावर्गात लावण्यात येतील. शाळेच्या नजीकचे प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी दवाखाना, डेन्टिस्ट यांना बोलावून शाळेत तंबाखूचे दुष्परिणाम, कॅन्सरची लक्षणे, मुखतपासणी असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. शाळेत जे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तंबाखू निर्मुलनासाठी हिरीरीने भाग घेउन कार्य करतील त्यांचा मुख्याध्यापक प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देउन सत्कारही करणार आहेत. तंबाखूमुक्तीचे सर्व निकष पूर्ण झाल्यानंतर शाळेच्या प्रवेशद्वारावर तंबाखूमुक्त शाळा असा फलक लावण्यात येणार आहे.