आळेफाटा – शिवसेनेने विमा कंपन्यांच्या विरोधात मोर्चा काढल्यानंतर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना फोन करून तुमचे विम्याचे पैसे मंजूर झाले असल्याचे सांगितले. यापुढील काळात आपण शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करणार आहोत, मला तुमच्या मनातला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. म्हणूनच ही जन-आशीर्वाद यात्रा सुरू असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
आळेफाटा या ठिकाणी जन-आशीर्वाद यात्रेचे जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार शरद सोनवणे, नेताजी डोके व अक्षय आढळराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना झाडाचे रोपटे देऊन त्यांचे स्वागत केले.
या प्रसंगी पर्यावरणमंत्री रामदास कदम, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, संपर्क प्रमुख दिलीप बाम्हणे, जिल्हा प्रमुख माऊली कटके, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, माजी सभापती राजेंद्र गुंजाळ, दिलीप डुंबरे, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, मंगेश काकडे, संभाजी तांबे, सचिन चव्हाण, पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण, हिराबाई चव्हाण, स्मिता विटे, विभाग प्रमुख बाजीराव लाड, महेश बांगर, बाळासाहेब कुऱ्हाडे, उदय पाटील भुजबळ, गणेश गुंजाळ, माऊली शेजवळ, राजेंद्र शिंदे, भाऊ भुजबळ, राजू वाव्हळ, प्रदीप देवकर, पप्पू हाडवळे, जी. के. औटी व शिवसैनिक उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, यापुढील काळात भगवी सत्ता येणार आहे व येणारे सरकार हे तुमच्या न्याय हक्कासाठी लढणारे असेल. गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळे विषय हाती घेतले, आंदोलने केली, अन्यायाविरुद्ध लढा देऊन संघर्ष केला. शहरातील लोक शेतकऱ्यांसाठी मोर्चा घेऊन गेले हे असं पहिल्यांदाच घडत आहे. मला हा महाराष्ट्र प्रदूषणमुक्त, दुष्काळमुक्त व बेरोजगारीमुक्त घडवायचा आहे. मी मते मागायला तुमच्याकडे आलो नाही तर या यात्रेच्या माध्यमातून तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. तुम्ही लोकसभेला घवघवीत यश मिळवून दिले, त्याबद्दल तुमचे आभार मानायला मी येथे आलोय. सत्ता असो वा नसो आपण जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी येथे आलो आहे. शिवसेनेचे शेतकऱ्यांना प्राधान्य आहे.
मोर्चा काढल्यानंतर नाशिकमध्ये विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे थकविलेले चौदा कोटी रुपये दिले व उर्वरित तीन कोटी रुपये पुढील आठवड्यात देणार आहे. शेतकऱ्यांसाठी असलेला हा लढा कायम पुढे चालू राहील, असे यावेळी त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन गणेश गुंजाळ यांनी केले तर माजी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके यांनी आभार मानले.