सातारा शहरातील स्थिती : पाण्याची तहान भागविण्याची गरज
सातारा – उन्हाच्या तडाक्याची झळ आता मनुष्यांप्रमाणे छोट्या मोठ्या झाडांना ही बसायला लागली आहे. सध्या साताऱ्यात तळपत्या सुर्याचा प्रहार थेट होत असल्यामुळे छोटी रोपे माना खाली टाकत आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी रोपे आता जळायला लागली आहेत. त्यामुळे पालिकेने आणि परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी रोपांना पाणी घालण्याची गरज आहे. अन्यथा अत्ताच वृक्षवल्ली वाचविली नाही तर येत्या काळात पर्यावरणाचा समतोल आणखी ढासळणार आहे.
सध्या सातारा जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात पाण्याअभावी पिके करपायला लागली आहेत. असाच परिणात आता सातारा शहरात ही ठिकठिकाणी दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या समोरील ग्रीन लॉन तसेच छोटे रोपे जळायला लागली आहेत. त्याचबरोबर एस.टी.स्टॅंडसमोरील डिव्हायडरमध्ये लावण्यात आलेली रोपे तसेच सिव्हील हॉस्पिटलच्या समोरील दुरांडा देखील जळायला लागला आहे.
साहजिकच ही स्थिती प्रातिनिधीक स्वरूपात असली तरी अशी परिस्थिती सातारा शहरात अनेक ठिकाणी दिसून येईल. वास्तविक वनराईमुळे मनुष्याला ऑक्सिजन प्राप्त होतो.
पर्यावरणातील प्रदूषण दूर होवून थंडावा निर्माण होतो. त्यामुळे झाडे जगली आणि वाढली पाहिजेत, यासाठी समाजघटकातील सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. उन्हाळा अद्याप एक ते दिड महिना कायम राहणार आहे. त्यामुळे यापुढे ही उन्हाची दाहकता कायम राहणार आहे. अशा स्थितीत झाडांचे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.