बीड: विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास आणि दुष्काळमुक्तीचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करु, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परळी येथील गोपीनाथ गड येथे केले.
गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथगड परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व होते. गरीब आणि वंचिताच्या विकासासाठी ते शेवटपर्यंत झटले. मराठवाड्याच्या विकासाबरोबरच हा भाग दुष्काळमुक्त व्हावा हे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्याने पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी समुद्रात जाऊ नये यासाठी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याशिवाय मराठवाडा वॉटरग्रीड अंतर्गत मराठवाड्यात पाण्याचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी इस्राईल सोबत करार करण्यात आला असून पाच विकास आराखड्यांना मान्यता देण्यात आली आहे. याकरिता 20 हजार कोटी खर्च लागणार आहे. बंद पाईपद्वारे हे पाणी गावागावात शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करुन दिले जाईल.
बीड जिल्ह्याच्या विकासाबाबत फडणवीस म्हणाले की, कृष्णा खोऱ्यातील 25 टी.एम.सी. पाणी मराठवाड्याला मिळण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे. याचा लाभ बीड जिल्ह्याला होणार आहे. बीड जिल्ह्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा रेल्वेचा प्रश्न लवकरच सुटणार असून नगर-बीड-परळी रेल्वे लाईनचे काम वेगाने सुरु आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि वंचितांच्या कल्याणासाठी कामकाज करताना अनेक निर्णय घेतले आहेत. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा करण्यात येत आहे. राज्यात विविध भागातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजनांची सध्या अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत आहे. जनावरांसाठी चारा छावण्या उघडण्यात आल्या आहेत. दुष्काळ निवारण्यासाठी केंद्र सरकारकडून 1300 कोटी रुपयांचे दुष्काळी अनुदान प्राप्त झाले आहे.
या शिवाय निधी लागल्यास शासनाच्या तिजोरीतून दिला जाईल त्यामुळे जनतेने कुठल्याही प्रकारची काळजी करु नये, शासन आपल्या पाठीशी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण घडल्याचा उल्लेख करीत ते म्हणाले की,गोपीनाथराव मुंडे यांचे व्यक्तिमत्व, नेतृत्व क्षमता अफाट होती. त्यांच्या परिसस्पर्शामुळे राज्यात अनेक नेते घडले. मुंडे साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आम्ही निश्चितपणे उभा करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.