नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले आहेत. मात्र यावेळी मोदींचा मुखपृष्ठावरील फोटो हा सकारात्मक लेखासंदर्भात नसून पंतप्रधान मोदींचा उल्लेख टाइमने दुफळी निर्माण करणारा प्रमुख नेता असा केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी हिंदुत्वावर आधारित राजकारण करत असल्याचा आरोप मोदींसंदर्भात लेख लिहिणाऱ्या आतिश तासीर यांनी केला आहे.
लोकप्रियतेमुळे कोलमडलेली लोकशाही म्हणून भारताचे नाव घेता येईल या वाक्याने लेखाची सुरुवात झाली आहे.
या लेखामध्ये तुर्की, ब्राझील, ब्रिटन आणि अमेरिकेप्रमाणेच भारतातही लोकशाही मूल्यांपेक्षा एखाद्याची लोकप्रियता अधिक वाढल्याचे दिसत आहे असे लेखकाने म्हटले आहे. लोकप्रियतेमुळे या आधी दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या बहुसंख्याकांच्या भावनांना वाचा फोडण्याचे काम झाले आहे. मात्र यावेळी देशातील वातावरण निकोप व उत्साहवर्धक राहिलेले नाही, असे लेखात म्हटले आहे.
या लेखामध्ये 2014 च्या निवडणुकांनंतर अनेक बदल झाल्याचे म्हटले आहे. एक राष्ट्र म्हणून भारताची वैशिष्ट्ये, भारताचे निर्माते, भारतातील अल्पसंख्याक आणि देशातील संस्थांचा कारभार असे सर्वकाही विस्कळीत पद्धतीने मांडण्यात येत असल्याची टीका लेखकाने केली आहे.
स्वतंत्र भारताने मिळविलेल्या सहिष्णुता, उदारमतवादी धोरण, स्वतंत्र प्रसारमाध्यमे यासारख्या गोष्टींही एखाद्या कटाचा भाग असल्याप्रमाणे 2014 च्या निवडणुकांनंतर भासवले जात आहे, असे टीका तासीर यांनी केली आहे. लेखक तासीर यांनी मोदी हे 2002 च्या गुजरात दंगलीनंतर शांत राहण्याचा निर्णय घेतल्याने ते एका ठराविक गटाच्या बाजूने झाले असे लेखात म्हटले आहे. तासीर यांच्या लेखाबरोबरच याच अवृत्तीमध्ये मोदी एक बदल घडवणारा नेता असाही लेख इयन बेरीमेर यांनी लिहिला आहे.