सोलापूर – मुंबई व कोकण किनारपट्टीला पडणाऱ्या पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. ते पाणी अडवून पुढे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात टप्याटप्याने आणून नद्या जोडण्याच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणे शक्य आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठी रामदास आठवले हे सोलापूर दौऱ्यावर होते. याप्रसंगी ते बोलत होते. आठवले म्हणाले, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी नद्याजोड प्रकल्प काळाची गरज आहे. पाण्याचे योग्य नियोजन आणि इरिगेशन वाढविल्याशिवाय ही परिस्थिती सुधारत येणार नाही. ही जबाबदारी सरकारची असून यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक्सपर्ट कमिटी नेमावी. तसेच नरेंद्र मोदींना संधी मिळाल्यास पुढील पाच-दहा वर्षात शिवारे हिवरवीगार दिसतील यात शंका नाही, असे त्यांनी सांगितले.
यंदा विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे टॅंकर व चार छावण्या सुरु आहेत. सोलापूर जिल्ह्यात 234 गावांना 260 टॅंकरने पाणीपुरवठा सुरु आहे. पाच लाख आठ लोकसंख्या दुष्काळाने बाधित आहे. विहिरी व बोअर अधिग्रहित केल्या आहेत. दरम्यान, 70 वर्षांपूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी नद्या जोड प्रकल्प राबविला होता. मात्र येथील पाणीपुरवठा विभागाचे प्लॅनिंग योग्य पद्धतीने होऊ न शकल्याने दुष्काळाची दाहकता अधिकच वाढली आहे.
महाराष्ट्रात 14 ते 15 टक्केच इरिगेशन आहे. अलीकडील 25 वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. आज मात्र नदी, नाले आणि ओढे कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे शेती, जनावर तसेच माणसांच्या पाण्याची समस्या निर्माण झाली, असे आठवले यांनी सांगितले.
उजनी धरणाचे पाणी आवश्यकतेप्रमाणे सोलापूरला मिळते. उजनीवर कोणत्या एका नेत्याची मक्तेदारी असता कामा नये. महाराष्ट्र सरकार कोणाच्या मक्तेदारीला भिख घालत नाही. सोलापूरला जेवढे पाणी द्यायचे असते तेवढे पाणी देण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना बोलू असे ते म्हणाले.
“वंचित’चा भाजप-सेनेला फायदा
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा फायदा भाजप-सेनेला फायदा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही. प्रकाश आंबेडकर सोडले तर अन्य कोणत्याही उमेदवाराला 1 लाखापेक्षा अधिक मते मिळणार नाहीत, असे रामदास आठवले म्हणाले.