पालघर – पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीमधील केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रिया सुरु असताना वायुगळती झाल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. विशेष म्हणजे या कामगारांची तपासणी करताना संबंधीत डॉक्टरांनाही वायूची लागण झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एस्क्वायर केमिकल प्लॉट क्र. एन 60 मध्ये रासायनिक प्रक्रिया करताना वायुगळती झाली. त्यावेळी तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. या वायुगळतीमध्ये सापडलेल्या कामगारांचा त्रास जाणवू लागला. त्यांच्यावर तुंगा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कामगारांच्या मृतदेहाची तपासणी करीत असताना डॉक्टरांनाही चक्कर आल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.