तिघांना पाच वर्षे कारावास
एका आरोपीची पुराव्या अभावी सुटका
पठाणकोट – जम्मू-काश्मीरातील कठुआ जिल्ह्यात एका आठ वर्षीय बालिकेवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी जलदगती न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची, तर अन्य तिघांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावणी आहे. तर सातव्या आरोपीला पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे देशभर संतप्त प्रतिक्रीया उमटल्या होत्या व त्या अनुषंगाने आरोपींना त्वरीत अटक करावी या मागणीसाठी देशभरात मोर्चे व निदर्शने आयोजित करण्यात आली होती.
या प्रकरणाचा माजी सरकारी कर्मचारी सांजी राम हा मास्टरमाईंड असून त्याचाही दोषी आरोपींमध्ये समावेश आहे. पण त्याच्या मुलाची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. सांजी राम, दीपक खजूरिया, प्रवेश कुमार या तिघांना जन्मठेप आणि प्रत्येकी 1 लाख रुपयांचा दंड ठोठाविला आहे. तर सुरेंद्र वर्मा, आनंद दत्ता, तिलकराज या तिघांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने त्याची सुनावणी ईन कॅमेरा पद्धतीने झाली. हा खटल्याची सुनावणी 3 जुनला संपल्यानंतर न्यायालयाने आज निकाल जाहीर केला.
पीडित मुलगी मुस्लिम अदिवासी समाजाची आहे. तिचे गेल्या वर्षीै 10 जानेवारीला अपहरण करण्यात आले. तिला कठुआतील एका मंदिरात कोंडून ठेवण्यात आले. तिच्यावर सतत अमानुष अत्याचार आणि बलात्कार करण्यात आला. नंतर तिची हत्या करण्यात आली. या मुलीचा छिन्नविच्छीन्न मृतदेह 17 जानेवारी रोजी एका जंगलात आढळून आला. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला प्रथम आरोपी म्हणून अटक करण्यात आली. तथापी तो अल्पवयीन असल्याने त्याच्यावर खटला दाखल करण्यास विलंब झाला होता. हाच आरोपी सांजीराम यांचा मुलगा आहे.
क्राईम ब्रॅंचकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी एक सबइन्स्पेक्टर आणि हेडकॉन्स्टेबलला पुरावा नष्ट केल्याच्या कारणावरून अटक केली. कठुआ जिल्ह्यात वारंवार प्रवेश करणाऱ्या मुस्लिम अदिवासी समुदायावर दहशत निर्माण करण्यासाठीच या मुलीवर बलात्कार आणि हत्या करण्याचा प्रकार घडला आहे असे सांगण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा खटला जम्मू काश्मीर राज्याच्या बाहेर हलवण्यात आला.