लातूर – लातूर जिल्ह्यातील आलमला गावात एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. गावातल्या एका बुजवलेल्या विहिरीत सिमेंटचा पाईप टाकून एक आड तयार करण्यात आला आहे. हा आड साफ करण्यासाठी गेलेल्या सहा मजुरांना आडातील विषारी वायूचा सामना करावा लागला. या घटनेत आडात उतरलेल्या तीन मजुरांचा जागीच गुदमरुन मृत्यू झाला आहे. तर दोन मजूरांवर लातूरमधील दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
लातूर जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे. तिथे पाणी मिळवण्यासाठी लोकांची धडपड सुरु आहे. परंतु पाण्यासाठीची ही धडपड लोकांच्या जीवावर बेतत आहे.
आलमला या गावात एक आड आहे. या आडातल्या पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे सहा मजुरांना हा आड साफ करण्याचे काम देण्यात आले होते. यात एकाच घरातील तीन मजूर आडात खाली उतरले होते. आडात बऱ्याच महिन्यांपासून गाळ साचला होता.
मजुरांनी गाळ भरण्यासाठी एक टोपले नेले होते. गाळ टोपल्यात भरायला सुरुवात केल्यानंतर विषारी वायू बाहेर येऊ लागला. या वायूमुळे खाली उतरलेल्या तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर आडाच्या वरच्या बाजूला उभ्या असलेल्या मजुरांना विषारी वायूचा त्रास होऊ लागल्यानंतर ते दोघे आडाच्या बाहेर आले. वर येत असताना त्यांनादेखील या वायूचा त्रास झाला. त्यामुळे त्या दोघांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.