ठाणे – नवी मुंबई येथे तुर्भे भागातील तीन जणांना भोसकून ठार मारण्यात आल्याचे आढळून आले आहे. यातील दोन जण सख्खे भाऊ आहेत. एमआयडीसी भागातील एका गोडाऊन मध्ये हे तीन मृतदेह आढळून आले.
मृत व्यक्तींची ओळख पटली आहे. त्यांची नावे इर्शाद वय 20, त्याचा धाकटा भाऊ नौशाद वय 19 आणि राजेश वय 28 अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही जण उत्तरप्रदेशातील आहेत. ते येथे मोलमजुरीसाठी आले होते. त्यांच्या हत्येचे नेमके कारण मात्र अजून समजू शकलेले नाही.
पुर्व वैमनस्य अथवा पैशाच्या कारणावरून या तिघांची हत्या झाली असावी असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी रात्री त्यांची हत्या झाली आहे. त्यानंतर त्यांचे मृतदेह तेथेच टाकून देण्यात आल्याचे आढळून आले. या घटनेची चौकशी करण्यासाठी तपास पथके स्थापन करण्यात आली आहेत.