गणेश महाराज जांभळे : इंद्रायणी महाविद्यालयाकडून सन्मान
तळेगाव दाभाडे – तंत्रज्ञानाच्या युगात “टू जी’, “थ्री जी’, “फोर जी’मुळे जग जवळ आले असले तरी, त्यामध्ये मनुष्यच प्रोग्रामिंग करीत असतो. त्यामुळे योग्य-अयोग्य, चूक-बरोबर, निती, न्याय, धर्म, आचरण या गोष्टी तंत्रज्ञानाला कळत नाहीत, त्या उलट गुरूंकडे निती, न्याय, धर्म, आचरण यांचे शास्त्र असून योग्य-अयोग्य याचा अभ्यास असतो. त्यामुळे आजच्या काळामध्ये गुरुंची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन गणेश महाराज जांभळे यांनी केले.
इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयात गुरूपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संभाजी मलघे होते. याप्रसंगी प्रा. अशोक जाधव, यु. व्ही. भोसले, एस. डी. शिंदे, पी. व्ही. भेगडे आदी उपस्थित होते. जांभळे पुढे म्हणाले, आयुष्यात प्रगती करायची तर ज्ञानेश्वर माउली म्हणतात गुरू महत्त्वाचा आहे. गुरू शिवाय प्रगती नाही.
वारकरी संप्रदायात ज्ञान व कर्तृत्वाला फार किंमत आहे. वेद, पुराण, महाभारत हे शास्त्र निर्माण केले. मनुष्याला घटनेत बांधले आहे. गुरूंचा परीस स्पर्श लाभल्याशिवाय शिष्यरूपी लोखंडाचे सोन्यात रूपांतर होऊ शकत नाही. गुरूजी शिवाय पर्याय नाही. गुरूवर विश्वास ठेवला म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज निर्माण केले. विद्यार्थ्यांनी गीता, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. त्यातूनच धैर्य, शक्ती प्राप्त होत, असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनीही मार्गदर्शन केले. सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या वतीने ऐश्वर्या जाधव, दिप्ती जांभुळकर, आकांक्षा जाधव, क्षताक्षी साह यांनी तर शिक्षकांच्या वतीने प्रा. आर. आर. डोके, प्रा. आर. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. यु. व्ही. खाडपसर व प्रा. एस. पी. भोसले यांनी केले. सूत्रसंचालन दिप्ती कन्हेरीकर व वीणा महाजनी यांनी केले. प्रा. ए. आर. जाधव, प्रा. प्रतिभा गाडेकर, प्रा. मेघा कुटे, प्रा. सविता चौधरी, स्नेहल भेगडे यांनी संयोजन केले.