पिण्यासाठी कळमोडीतून पाणी सोडले
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील तीनही धरणांनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्याचे संकट आले आहे. तालुक्यातील तिसरे धरण असलेल्या कळमोडी धरणातून नागरिकांना पिण्यासाठी सोमवारी पाणी सोडण्यात आले आहे.
तालुक्यात भामा आसखेड, चासकमान व कळमोडी ही तीन धरणे आहेत शिवाय कडूस वाफगाव आणि राजगुरुनगर येथे पाझर तलाव आहेत. मात्र हे तीनही तलाव कोरडे पडले असून भामा आसखेड धरणात 8.82 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. चास कमान धरणात 3.65 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर कळमोडी धरणात 18 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कळमोडी धरणातून पिण्यासाठी परिसरातील गावांना व चास कमान धरणात पाणी सोडण्यात येत आहे. मोसमी पावसाने दडी दिल्यास उपयुक्त पाणीसाठा कमी पडणार आहे.
कळमोडी धरणातून धरणाखालील गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. धरणाखालील कळमोडी, चिखलगाव, साकुर्डी, कहु-कोयाळी, माझगाव या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. गेली अनेक दिवसांच्या मागणीनंतर प्रशासनाने कळमोडी धरणातून आरळा नदीत सांडव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. कळमोडी धरणातून सोडण्यात आलेले पाणी चासकमान धरणात साठणार असून ते पुढे राजगुरुनगर शहरासह परिसरातील गावांना सोडण्यात येणार आहे.