मुंबई : राज्यात रानमळा वृक्षलागवडीचा पॅटर्न नगर विकास आणि ग्रामविकास विभागामार्फत “वृक्षाची जोपासना हीच निसर्गाची उपासना” या नावाने राबविला जातो. याअंतर्गत मानवी जीवनातील विविध घटना-प्रसंगांच्या आठवणी वृक्ष लावून चिरंतन करण्यात येतात. ३३ कोटी वृक्षलागवडीत यावर्षी अशी ३ लाख ४८ हजार ८८७ “आठवणींची झाडं” लागणार आहेत.
जन्म, मृत्यू, विवाह, वाढदिवस, परीक्षेतील यश, नोकरीचा पहिला दिवस, सासरी जाणाऱ्या लेकीची आठवण, दुर्देवाने घरातील जिवलगाचा झालेला मृत्यू अशा विविध सुख-दु:खाच्या प्रसंगाच्या निमित्ताने खेड तालुक्यातील रानमळा या गावात वृक्ष लावले जातात. गावात वर्षभर घडणाऱ्या अशा घटनांची माहिती घेऊन संबंधितांना ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनी वृक्षदिंडी काढून ग्रामपंचायतीमार्फत रोपांचे वाटप केले जाते. या उपक्रमातून आज रानमळा हे गाव हिरवेगार झाले आहे. वृक्ष लागवडीचा हाच पॅटर्न वन विभागाने राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आणि त्यापद्धतीने केलेल्या नियोजनानुसार ग्रामविकास आणि नगरविकास विभागाने यासाठीचे शासननिर्णय निर्गमित केले. आता ३३ कोटी वृक्षलागवडीत ही आठवणींची झाडे लावली जातील. ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात अशा रोपांची लागवड होणार आहे.
#रानमळा वृक्षलागवडीचा पॅटर्न नगर आणि ग्रामविकास विभागामार्फत 'वृक्षाची जोपासना हीच निसर्गाची उपासना' या नावाने सुरु. याअंतर्गत मानवी जीवनातील विविध आठवणींचे वृक्ष लावून होतेय जतन. ३३ कोटी वृक्षलागवडीत यावर्षी अशी ३ लाख ४८ हजार ८८७ #आठवणींचीझाडं लागणार pic.twitter.com/Q85BYz9PXe
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 12, 2019
माणसाचं मन खूप हळव असतं. मनाच्या कोपऱ्यात अनेक आठवणी साठवून ठेवलेल्या असतात. पण त्याच आठवणी जर वृक्षरुपाने जिवंत राहिल्या तर पर्यावरण रक्षण तर होतेच पण गाव-शहरामधली वनराई वाढून हरित महाराष्ट्राची वाटचाल देखील सोपी होण्यास मदत होते.