कोलकता -काही प्रादेशिक पक्ष भाजपऐवजी कॉंग्रेसच्या विरोधात लढण्यालाच पसंती देत आहेत. त्या प्रादेशिक पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमच्याकडून पाठिंब्याची अपेक्षा ठेऊ नये, अशी भूमिका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी सोमवारी मांडली.
पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना खुर्शिद यांनी संबंधित भूमिका मांडताना त्या प्रादेशिक पक्षांचा नामोल्लेख टाळला. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएची सत्ता केंद्रात येईल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची किंवा प्रादेशिक पक्षांच्या आघाडीची सत्ता येण्याची शक्यता फेटाळून लावली.
लोकसभा निवडणुकीआधी एकत्र येण्याचे आवाहन आम्ही सर्व विरोधी पक्षांना केले होते. मात्र, काही प्रादेशिक पक्षांनी तो प्रस्ताव फेटाळला. आता त्यांनी ठरवायचे आहे, असे ते म्हणाले. एनडीएमध्ये सहभागी नसलेल्या पक्षांचा कल भाजपपेक्षा कॉंग्रेसकडे अधिक आहे. विरोधकांचा पंतप्रधान निकालानंतर ठरेल. वस्तुस्थिती पाहून निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोदी सरकारचे सत्तेतून बाहेर जाणे निश्चित असल्याचे भाकीतही त्यांनी यावेळी केले.