पाण्यासाठी दाहीदिशा : पवन मावळ परिसरात पाणी टंचाईच्या झळा
चावसर परिसरालाही टंचाई
उन्हाळ्यात विहीर तळ गाठते, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने दररोज दोन टॅंकर पाणी विहिरीत सोडून त्यातून गावाला पाणी मिळते; परंतु हे पाणी पुरेसे ठरत नाही. सध्या गावासाठी 54 लाखांची पाणी योजना मंजुरीसाठी आहे. ती मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे; तर चावसर येथील डोंगरवाडी व विठ्ठलवाडी यांनी पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. विठ्ठलवाडीसाठी पूर्वीची नळयोजना तुटली असल्यांना त्यांनाही टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. तर डोंगरवाडी येथे नागरिकांना मात्र झऱ्याचे साठलेले दूषित पाणी प्यावे लागत आहे. तुंग गावाजवळ असलेल्या विहिरीमुळे गावाला मुबलक असा पाणीसाठा उपलब्ध होत असतो; परंतु विहिरीने तळ गाठल्याने अनियमित पाणीपुरवठा होतो.
पवनानगर – पवना धरण हे पवन मावळाची मुख्य ओळख. भौगोलिकदृष्ट्या डोंगरदऱ्या, ऐतिहासिक तुंग, तिकोणा आणि लोहगड विसापूर हे किल्ले आहेत, यामुळे नवीन पर्यटन केंद्र म्हणून याची नवीन ओळख निर्माण झाली आहे. दरवर्षी या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मावळ तालुक्याचे हे शेवटचे टोक असून, या पवन मावळच्या सीमेलगत मुळशी व कोकणची किनारपट्टी असल्याने या परिसरात पावसाचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे पाण्याची मुबलक साठे व नैसर्गिक झरे उपलब्ध आहेत. यामध्ये काही धरणाच्या पूर्व भागातील गावाचा समावेश होतो, तर काही धरणाच्या आतील भागातील म्हणजेच पश्चिम पट्ट्यातील गावे आहेत. मात्र धरण उशाला असूनही गावांचा घसा कोरडा आहे. महिलांच्या डोक्यावर हंडापाहून गावातील पाण्यासाठी दाहीदिशा दिसून येत आहे.
पाण्यासाठी दाहीदिशा : पवन मावळ परिसरात पाणी टंचाईच्या झळा
पवना धरण परिसरातील काही गावांमधील महिलांना डोक्यावर पाण्याचे हांडे घेऊन पाणी आणावे लागते. शिळींब येथे ग्रामपंचायतीच्या वतीने जागोजागी बोअरवेलची व्यवस्था केली आहे. त्यांचा पाणीपुरवठा सुरळीत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते; मात्र याच ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असणाऱ्या बोडशीळ गावाला पाण्यासाठी नैसर्गिक झऱ्यावर अवलंबुन राहावे लागते. हे पाणी परिसरातील विहिरीत सोडले जाते. त्यातुन गावाला पाणीपुरवठा होत असते. या भागातील सगळ्यात जास्त पाणी टंचाईशी तोंड द्यावे लागते. तो म्हणजे मोरवे गावाला. हे गाव पवना धरणापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असल्याने या गावाला कोणतेही पाणी योजना नाही. त्यामुळे दरवर्षी मोरवे गावाला पाणी समस्येला तोंड द्यावे लागते. गावाच्या मध्यभागी असलेल्या विहिरीचे पाणी मार्चअखेर तळ गाठते.
महिलांच्या डोक्यावर हंडा
पवनाधरण हे या गावासाठी पाण्याचे मुख्य जलस्रोत आहे; त्यामुळे पूर्व भागातील गावे ही पवना नदीच्या काठावर वसलेली आहते. यामध्ये ब्राम्हणोली, कोथुर्णे, काले, येळसे, कडधे, महागाव, शिवली, येलघोल, धनगव्हाण, आर्डव, करूंज, बेडसे या गावांचा समावेश होतो. बहुतेक गावांची पाणी नळयोजना पवना नदीवरच आहेत. परंतु वाढती लोकसंख्या आणि जुन्या झालेल्या पाणी योजना यामुळे अनेक गावच्या नळकोंढाळी मोकळीच असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.
याशिवाय या परिसरातील ग्रामपंचायतीच्या अर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पाणी योजना नादुरूस्त किंवा बिघाड झाल्यावर त्याचा खर्च करणे देखील ग्रामपंचायतीला परवडत नाही. त्यामुळे कित्येक दिवस पाणी योजना बंद अवस्थेतच असतात. त्यातच गावतून पाणीपट्टी वसूल होत नसल्याने दुरूस्ती करणेही अवघड होत आहे. बहुतांशी हा ग्रामीण भाग असल्याने आणि गावे छोटी छोटी असल्याने नादुरूस्त झालेली पाणी योजना कालबाह्य ठरत आहेत.
पवना नदीकाठचा सर्वच भाग बागायती असल्याने या गावाला पाण्याची उपलब्धता निर्माण आहे; परंतु तरीही काही गावांमध्ये मुबलक पाणी कर काही ठिकाणी पाण्याचा थेंब नसल्याचे चित्र दिसत आहेत. तर लोहगड, धालेवाडी, मालेवाडी, घेरेवाडी, दुधीवरे ही गावे धरणापासून डोंगरावर असल्याने येथील पाणीयोजना जीर्ण झाल्या असून, त्या कालबाह्य ठरत आहेत. त्यातच वाढत्या लोकसंख्येचा विचार करता येथील नागरिकांनी पाण्यासाठी विहीर, नैसर्गिक झरे किंवा बोअरवेलवर अवलंबून रहावे लागते. उन्हाळ्यात नैसर्गिक झरे आटले, बोअरवेलची पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे या गावांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
तसेच पवना धरणीाच्या पश्चिम पट्ट्यातील गावातील गावांचा विचार करता उन्हाळ्यामुळे पवना धरणाची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. या भागातील जवण नं. 1, 2 व 3, अजिवली, चावसर, मोरवे, बोडशीळ, वाघेश्वर, तुंग, विठ्ठलवाडी, डोंगरवाडी या गावांना दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. सध्या जवन येथे टॅंकरने पाणी पुरवठा सुरू असून, येथील विद्युत पंपाद्वारे पाणी टॅंकरमध्ये भरून पाणी वाटप केले जाते.
अजिवली येथील पूर्वीची पाणीयोजना ही राईच्या डोंगरातून नैसर्गिक झऱ्यावर असून, त्याद्वारे गावाला पाणी पुरवठा केला जातो. परंतु काही दिवसांपूर्वी लागलेल्या वनव्यामुळे ही पाईपलाईन नष्ट झाली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने 29 लाख रूपयाची पवना धरणावर मंजूर केलेली नवीन पाणी योजना अजून, ठेकेदाराने ग्रामपंचायतीकडे हस्तांरीत न केल्याने ती बंद अवस्थेत आहे. त्यामुळे अजिवली ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहेत.
मावळ तालुक्यात 2009 पासून आजअखेर अधिकृतरीत्या कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला नाही, त्यादृष्टिने टंचाई जाणवत नाही. अपवादात्मक स्थितीत एखाद्या गावात मागणी झाल्यास ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावाला पिण्याचे पाणी पुरविले जाते. तालुक्यातील सर्व गावचे प्रतिनिधींची आज, बुधवारी टंचाई आढावा बैठक झाली. पवन मावळातील शिळीम, चावसर गावात टंचाईसदृश्य परिस्थिती भासली होती, मात्र काही हॉटेल्स, दानशूर व्यक्तींकडून पाणी पुरविण्यात येत आहे. पुढील काळात टंचाई भासल्यास तात्काळ पाणीपुरवठा केला जाईल.
– रणजित देसाई, तहसीलदार, मावळ.