– नीलकंठ मोहिते/एम. एम. शेख
अकलूज – वारकऱ्यांमधील उत्साह, हरिनामाचा जयघोष आणि अश्वांबरोबर धावणारे वैष्णवजन अशा आसमंत व्यापणाऱ्या वातावरणात तुकाराम महाराजांच्या पालखीचा तिसरा रिंगण सोहळा रविवारी (दि. 7) अकलूजमध्ये रंगला. लाखो वारकऱ्यांसह परिसरातील ग्रामस्थांनी हा सोहळा डोळ्यांमध्ये टिपला.
पुणे जिल्ह्यातील प्रशासनाचा लवाजमा सोलापूर जिल्ह्यात पालखी दाखल होत असताना मोठ्या संख्येने उपस्थित होता तर नीरा नदीच्या पात्रा पलीकडे अकलूज शहराच्या हद्दीत सोलापूर जिल्ह्याचेअकलूज शहराच्या हद्दीत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीच्या सभापती वैष्णवी देवी मोहिते-पाटील, अकलूज गावचे सरपंच शिवतेज सिंह मोहिते पाटील यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. नीरा नदीच्या पात्रा पलीकडे पालखी सोहळा गांधी चौकमार्गे सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणावर दाखल झाला. अकलूजकरांनी बेलबुक्का पालखीतील पादुकांवर अर्पण करीत वारकऱ्यांना अन्नदान करीत प्रथेप्रमाणे स्वागत केले. तद्नंतर माने विद्यालयाच्या प्रांगणावर पालखीच्या चोपदारांनी गोल रिंगण लावले.
रिंगण स्थळावर पहिल्यांदा पालखीसमोर चालणारा नगरा दाखल झालानंतर झेंडेकरी विणेकरी मानाच्या दिंड्या असे हजारो वारकरी गोल रिंगणात सहभागी झाले. ज्ञानोब, तुकोबांच्या गजरात व वयाची तमा न करता अनेक वृद्ध वारकरी, झेंडेकरी, टाळकरी व विणेकरी, तुळशीधारक महिला मोठ्या वेगाने धावले. पालखीसोबत चालणाऱ्या बाल वारकऱ्यांनी पावल्या खेळत उपस्थितांची मने जिंकली तर शेकडो पखवाज वादन करणाऱ्या पखवाजे यांनी एकाच तालात पखवाजातून माऊली… माऊली असा गगनभेदी सुरामुळे रिंगण सोहळ्याची आतुरता वाढली गेली. मानाच्या अश्वांचे पूजन विधिवत करण्यात आल्यानंतर हे अश्व धावण्यासाठी रिंगणात सोडण्यात आले.
हरिनामाचा चाललेला जयघोष, शिगेला
टिपलेला टाळ, व वारकऱ्यांच्या मुखातून येणारा माऊली-माऊली आवाज यामुळे रिंगणात सोडलेले दोन्ही अश्व काही क्षणात परिक्रमा पूर्ण करीत चरण पादुकांना दर्शनासाठी पालखी जवळ दाखल झाले. आणि एकच झुंबड रिंगणस्थळी सुरू झाली, ती म्हणजे कपाळी माती लावण्याची अश्वांच्या टापाखाली लाल माती कपाळी लावून अकलूजकरांनी विठुरायाला भरभरून पाऊस दे,असे साकडेच घातले.
अश्वांच्या परिक्रमा पूर्ण होतात रिंगण स्थळावर हजारो महिला पुरुषांनी फुगड्या धरल्या तर कित्येकांनी लगोऱ्या रचल्या त्यामुळे रिंगणातील उत्साह ओसांडून वाहत होता. रिंगण सोहळ्यासाठी लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. तब्बल 222 किलोमीटरचा प्रवास करीत आलेले हे संत तुकोबारायांच्या पालखीतील वारकऱ्यांनी शेवटचे गोल रिंगण मोठ्या आनंदाने पार पाडले. पालखीतील मानाच्या शिंगडाच्या तुतारीने आसमंत भक्तीरसात आलेचा प्रत्यय उपस्थितांना येत होता. त्यामुळे अनोखे रिंगण यंदा पार पडले, अन् पालखी सोहळा अकलूज येथील विठ्ठल मंदिरात विसावला.
पंढरी अवघी 45 किमीवर
अवघ्या 45 किलोमीटर वर श्रीक्षेत्र पंढरी येत असल्याने वारकरी आपल्या हरी भजनाचा वेग वाढवताना दिसत आहेत. अकलूज शहरातील प्रत्येक चौकाचौकात अन्नदान वारकऱ्यांसाठी दिवसभर सुरू होते, तर पावसाची उघडीप असल्याने माळशिरस तालुक्यातील हजारो नागरिकांनी दर्शनासाठी दिवसभर रांगा लावल्या होत्या.