पारनेर: ज्यांचे नाव नगर लोकसभा मतदारसंघात नाहीत, ते स्वत:ला मतदान करू शकत नाही, तसेच ते महाशय मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर तुम्हाला भेटणारही नाहीत. खासदारकी त्यांना फक्त स्वत: च्या ताब्यातील संस्थांचे घोटाळे झाकण्यासाठी हवी आहे, असा थेट आरोप आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केला.त्यांच्या 18 स्वीयसहायकांच्या टोलवा-टोलवीमुळे आपल्या समस्या त्यांच्याकडे सांगणे अवघड आहे. त्यामुळे अशा कर्तबगार लोकांना 23 तारखेनंतर कोठे भेटायचे, असा सवालही आ.जगताप यांनी उपस्थित केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातील वाळवणे, भोयरे गांगर्डा, कडूस, पाडळी रांजणगाव, वाडेगव्हाण आदींसह अनेक गावांमधील मतदारांच्या आ. जगताप यांनी आज सोमवारी गाठीभेटी प्रचार सभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ.जगताप यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी रॅली काढण्यात आली. ज्येष्ठ नेते सबाजीराव गायकवाड, निलेश लंके, अशोकराव सावंत, सरपंच पूनम मुंगसे, संजय गावंड, दौलत पवार उपस्थित होते.
आ.जगताप म्हणाले, ग्रामीण भागातून अनेक ग्रामस्थ विविध कामासाठी नगर शहरात येतात. त्यांना अनेक प्रकारच्या समस्या भेडसावत असतात. यापूर्वी आमच्याकडे अनेकजण संपर्क साधत असतात. अशावेळी या गरजवंतांना प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे काम केले जाते. यापुढे जे आम्हाला त्यांच्या समस्येसाठी हस्तेपरहस्ते संपर्क करतील, अशा गरजूंना त्यांच्या मदतीसाठी कायम उपलब्ध मी असणार. त्यामुळे आपल्या दक्षिणेच्य स्वाभिमान राखण्यासाठी मला लोकसभेची संधी द्यावी. सावंत म्हणाले, समोरचा उमेदवार सांगतो, दक्षिणेला माझी गरज आहे तर आ. जगताप नम्रपणे मत मागायला आल्याचे सांगतात, हा या दोन उमेदवारांमधला फरक आहे. त्यामुळे अहंकाराची आणि पैशाची हवा डोक्यात गेलेल्यांपेक्षा शेतकरी कुटुंबातून आलेला, आईवडिलांचे ऐकणारा आणि लोकांना सहज भेटणारा उमेदवार निवडू देऊ.