धोम, कण्हेर धरणग्रस्तांचे धोम जलाशयात आंदोलन
वाई – धोम, कणेर धरणग्रस्तांनी संयुक्तपणे 2 जुलैपासून धोम जलाशयातच बेमुदत आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी अकरा वाजता या आंदोलनाला धरणग्रस्तांनी सुरुवात केली. पांडुरंगाची पालखी वाजत-गाजत काढत बोरीव येथे धरण क्षेत्रात येवून आंदोलक पाण्यात उभे राहिले. जोपर्यंत शासन धोम व कणेर धरणग्रस्तांचे योग्यरित्या पुनर्वसन करण्याचे आदेश पुनर्वसन खात्याला देत नाही तोपर्यंत पाण्यातून बाहेर न येण्याचा निर्धार जनजागरण प्रतिष्ठानने केला.
दोन जुलैपासून धोम धरणामध्ये पाण्यात दिवस-रात्र बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला होता. धोम-कणेर लाभक्षेत्रातील धरणग्रस्तांनी आपापल्या गावांमध्ये बैठकीत घेवून आंदोलनाला स्वरूप देण्यात आले. तसेच आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करून साखळी आंदोलन यशस्वी होण्यासाठी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी अखेरची आरपारची लढाई लढण्यासाठी सर्व गावचे सरपंच, सामाजिक गणेशोत्सव मंडळे, गावागावांमधे असणारी सामाजिक काम करणारी मंडळे, तरूण मंडळी, महिलावर्गही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. साखळी आंदोलन राजकारण विरहीत असून सर्वच अन्याय झालेले सर्व लाभधारक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पाण्यातील साखळी आंदोलन यशस्वी करण्याची खुणगाठ बांधून सर्व आंदोलक मशाली पेटवून कृष्णामाईच्या पवित्र पाण्यात उभे राहिले असून न्याय मिळेपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. एकंदरीत पुनर्वसन प्रश्नांवरून धरणातील पेटणार आहे.