मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे लोकसभा निवडणुकीच्या पराभवापासून अधिकच सक्रिय झालेले आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही महाराष्ट्रात नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला असून पवार घराण्यातील एका वारसदारालाही मावळात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक सक्रिय झाला आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही आमदार वंचित बहुजन आघाडीत जाणार असे विधान केले होते. यावर एका कार्यक्रमा दरम्यान अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका केली आहे. अजित पवार म्हटले की, ‘वंचितची काँग्रेस आघाडीबरोबर येण्याची मानसिकताच नाही, लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसला आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न आघाडीकडून केला जात असल्याचं बोललं जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेला आघाडीबरोबर जाण्याचा कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही.’
तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही आमदार वंचित बहुजन आघाडीत जाणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण या चर्चा तथ्यहीन असून भाजपाप्रमाणेच संभ्रम निर्माण करण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.