खा. उदयनराजे : त्यांच्या करणीमुळे काही बरे-वाईट घडल्यास सर्वस्वी तेच जबाबदार
सातारा –“”जैसी करनी वैसी भरणी या न्यायातून कोणालाच सुट मिळत नाही. आमदार शिवेंद्रराजे आमचे बंधू असले तरी याला ते अपवाद नाहीत. लोकसभेला आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आमचे कामच केले असल्याने, आमच्या दिलेल्या शब्दात फरक पडणार नाही. शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघात आमचे पाठबळ राहील. त्या भूमिकेत बदल होणार नाही. तथापि, त्यांच्या करणीमुळे काही बरे-वाईट घडल्यास सर्वस्वी तेच जबाबदार असतील. “रोग रेडयाला आणि इलाज पखालीला’ असला त्यांचा सुरु असलेला प्रकार त्यांनी बंद करावा. स्वतःच निर्माण केलेल्या बागुलबुवांना स्वतःच निपटावे, आमच्यावर तर नाहीच नाही परंतु दुसऱ्या कोणावरही अगोदरच (प्री-मॅच्युरिटी) खापर फोडू नये,” असे तडाखेबंद प्रत्युत्तर खासदार उदयनराजे भोसले यांनी आज प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिले आहे.
आमदार शिवेंद्रराजे सध्या भलतेच सावध झाल्याचे त्यांच्या विधानांवरुन दिसत आहे. त्यांना सर्वत्र दगाबाजी, दगाफटका-धोका याचेच चित्रण डोळयासमोर येत आहे ,असा दाट संशय त्यांच्या विधानांवरुन येत आहे, असे नमूद करुन उदयनराजे पत्रकात म्हणतात, “”लोकसभा निवडणुकीच्या आधीची तुमची वक्तव्ये एकदा तपासून पहा. पवारसाहेबांनी आमदारांना विश्वासात घ्यावे, पवारसाहेब देतील तो उमेदवार मान्य असेल, पवारसाहेबांनी तिकीट दिले तरी उदयनराजेंचे काम करणार नाही, लोकसभेला उदयनराजेंचं कामच करणार, कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत वगैरे तुमचे उद्गार तुम्ही विसरलेला नसणार, किंवा तुम्ही मिशीवाल्यासोबत खाल्लेल्या चविष्ट मिसळीचा काही दिवसांनंतर आता तुम्हाला ठसका लागत असावा.
म्हणूनच कदाचित आता आमच्या प्रत्येक हालचालीविषयी तुम्हाला शंका उत्पन्न होत असावी. संशय घेणे ही तुमची कुजकी सवय आहे किंबहुना तो तुम्हाला वारसा लाभला आहे. तथापि, काहीही असले तरी आम्ही दिलेल्या शब्दाला जागणारे आहोत, तुमच्या विधानसभेला आमच्यापासून तरी काडीचाही धोका होणार नाही. उगाच साप समजून भुई थोपटण्याचा प्रकार टाळला पाहिजे.”
जावळीत तुम्हीच उभी केलेली भुतं तुमच्या मानगुटीवर बसायला कमी करणार नाहीत याची नोंद गांभीर्याने घ्या.तुमच्याच करणीने निर्माण केलेल्या बागुलबुवांवर तुमचा निशाणा ठेवा, तुम्ही जे केले आहे तेच तुम्हाला दसपटीने परत मिळणार आहे याची खुणगाठ पक्की बांधून दृष्टीने वाटचाल करा. आपण सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातुन मनोमिलनानंतर महाराष्ट्रातून दोन नंबरने निवडून आला होता. एक नंबरला अशोक चव्हाण आणि तीन नंबरला अजित पवार होते. इतके लिड भाऊसाहेब महाराजांपासून कोणालाही मिळालेले नाही हे विसरलात का, असा प्रश्न त्यांनी केला आहे.
तुमचा आणि भगीरथ उर्फ भोगीरथाचा दूरवर कसला संबंध आहे का नाही, हे सर्वांना माहिती आहे, उगाच विश्वामित्री पवित्रा घेऊ नका. लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही जाहीर सभेत आपणासह राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी चांगले सहकार्य केले आहे, असे जाहीर नमूद केले आहे. काही दिवसांनी कथित भगिरथ उर्फ भोगीरथ मात्र उदयनराजेना जावळीत कमी मते मिळाली ते पाहा, असा आगंतुक सल्ला देतो, आपण तर म्हणता की सातारा जावळीमध्ये मिळालेले मताधिक्य तुम्ही पक्षाशी प्रामाणिक राहून काम केल्याने मिळाले आहे, यावरुन तुमच्याबाबतीत संभ्रम कोण निर्माण करते आह,े हे एकदा शांतपणे विचार करुन ठरवा, असेही उदयनराजे यांनी शेवटी नमूद केले आहे.