पारगाव शिंगवे – आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील खार ओढ्यावरील बंधाऱ्याची दुरुस्ती सुरु असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे.
पारगावच्या खार ओढ्यावरील बंधारा हा 15 ते 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. या बंधाऱ्याची दुरवस्था झाल्याने बंधाऱ्याच्या प्लेअरमधून पाणी गळती सुरू होती. यामुळे या बंधाऱ्यात पाण्याचा साठा करण्यात येत नव्हता. या जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या छोट्या पाटबंधारे विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाकडून निधी मंजूर करण्यात आला. बंधारा दुरुस्तीचे काम सुरू असून या कामात वाळूचा एकही कण वापरण्यात येत नाही. कामात केवळ कच वापरण्यात येते. तसेच कामही व्यवस्थित करण्यात येत नाही. काम चांगले होत नसल्याने ग्रामस्थांनी हे काम बंद करण्यात सांगितले. गावचे सरपंच बबनराव ढोबळे यांनी या कामाची पाहणी केली व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कामात वाळूच वापर होत नसल्याचे सांगितले. तसेच सिमेंटचे वापरही कमी होत आहे. या बंधाऱ्यात साठवलेल्या पाण्याचा उपयोग येथील शेतकऱ्यांना होत आहे आणि विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होत असते, असे सरपंच बबनराव ढोबळे व ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे यांनी सांगितले.