नगर – आजकाल नागरिकांच्या भावना फार टोकदार झाल्या आहेत. नाट्य संहितेला, नाटकाला विरोध करण्यातून आणखीन वाद निर्माण होतात. यातून समांतर व्यवस्था निर्माण होवू नये यासाठी नाट्य परिनिरीक्षण मंडळाची गरज आहे.आजमितीला कोणत्याही नव्या संहितेला मान्यता देणे बाकी नसल्याने नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे काम झिरो पेंडेन्सीने सुरू आहे. असे मत नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी व्यक्त केले.
यावेळी नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य प्रविण कुलकर्णी, अमित बैचे, चैत्राली जावळे उपस्थित होते. नलावडे म्हणाले, नाट्य परिनिरीक्षण मंडळाच्या गावोगावी बैठका घेण्या मागे तिथल्या कलाकारांच्या समस्या समजाव्यात, त्यांच्याशी संवाद साधता यावा. या बैठकांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करता यावी असा आहे.
1954 सालापासूनच्या नाट्यसंहितांचे स्कॅनिंगचे काम पूर्ण झाले असून रंगभूमीच्या वेबसाइटवर या सर्व संहिता टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे नाट्य रसिकांना दुर्मीळ नाट्यसंहिता सहजपणे उपलब्ध होतील, असे ही नलावडे म्हणाले. नाट्यसंहितेवर घेतले जाणारे आक्षेप त्याचे लेले जाणारे निरसन याबाबतची प्रक्रियाच नलावडे यांनी यावेळी समजावून सांगितली. साधारणतः दर महिन्याला एका जिल्ह्याच्या ठिकाणी नाट्य परिनिरीक्षण मंडळाची बैठक घेतली जाते. नकारात्मक मतांचे रुपांतर सकारात्मकतेत करण्यास या बैठका उपयुक्त ठरत असल्याचे मतही नलावडे यांनी व्यक्त केले.