धरणातून रोज 32 घनफूट पाण्याचा उपसा : केवळ 28 टक्के पाणी शिल्लक
…तर तीव्र होणार पाणी टंचाईच्या झळा
जून महिन्यापर्यंतच पवना धरणातील पाणी पुरेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यावर्षी पावसाळ्याचे आगमन उशिरा होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पाऊस लांबला तर मात्र, पाणी टंचाईच्या झळा अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. यावर्षी जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही तर सध्याचे पाणी कपातीचे धोरण आणखी लांबू शकते.
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासह अनेक लहान-मोठ्या गावांची तहान भागवणाऱ्या पवना धरणातील पाणी झपाट्याने तळ गाठत आहे. पाणीसाठा कमी झाल्यानंतरही धरणातून होणारा पाणी उपसा कमी न झाल्याने धरणातील पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे, पाणी कमी झाल्याने अगोदरच पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरावर आणखी पाणी कपातीचे संकट उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने पिंपरी-चिंचवड शहराच्या घशाची कोरड आणखी वाढण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे धोरण महापालिकेने स्विकारले आहे. मात्र, शहरात पाणी कपात केल्यानंतरही धरणातील पाणी उपसा कमी झालेला नाही. आजही पवना धरणातून दररोज 32 घनफूट पाण्याचा उपसा होत आहे. पवना धरणातून उपसण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेतल्यानंतर धरण लवकरच मृतसाठ्यामध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या धरणात केवळ दोन टीएमसी पाणी वापरण्यायोग्य आहे. तर मृतसाठ्यामध्ये 1.18 टीएमसी पाणी ठेवावे लागते. त्यामुळे, पवना धरणातून उपसा होणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी केले नाही तर जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरी भागावर पाणी टंचाईची कुऱ्हाड कोसळणार आहे. जून महिन्यात अपेक्षित पाऊस पडला नाही तर मात्र पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पवना धरणात यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा झाला आहे.
पवना धरणाची पाणी साठवण क्षमता 8.51 टीएमसी एवढी आहे. मात्र, गेल्यावर्षी परतीचा पाऊस अत्यल्प पडल्याने ऑगस्टपर्यंतच्या पावसावरच पूर्ण वर्ष काढावे लागणार असल्याचा अंदाज आधीच आला होता. धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा झाल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाणी टंचाईचे संकट शहरी भागाला जाणवू लागले आहे. पवना धरणातून मावळ, पिंपरी-चिंचवड शहर, तळेगाव, देहूरोड, एमआयडीसी, तसेच अनेक ग्रामपंचायतीना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. तसेच सिंचनासाठीही मोठ्या प्रमाणात पाणी देण्यात येते. आज घडीला पवना धरणात केवळ 28 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीचा विचार केला तर 7 मे पर्यंत धरणामध्ये 36 टक्के पाणी शिल्लक होते. यावर्षी मात्र धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली येत आहे.
सध्या पवना धरणात 28 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील पाणीसाठा कमी होत असला तरी बाष्पीभवनामुळे पाणी साठा कमी होत नाही. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात धरण भरल्यामुळे पाणी सोडावे लागले होते. मात्र, सप्टेंबर महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे धरण पुन्हा भरले नाही. त्यानंतर आजपर्यंत पाणीसाठ्यात घट होत आली आहे. सध्या जो पाणीसाठा कमी होत आहे तो उपशामुळे होत असून उन्हामुळे बाष्पीभवन होऊन पाणीसाठा कमी झालेला नाही.
– ए.एम गडवाल, उपअभियंता, पवना धरण