भीमाबाई आंबेडकर वसाहतीच्या दुर्दैवाचे तीन तेरा : पालिकेचे हात पुन्हा कानावर
पालिकेने डिपॉझिट भरलेच नाही
पाणीबिलाच्या या गोंधळात एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली ती म्हणजे पाणी कनेक्शनचा मागणी करताना पालिकेने अडीच लाख रुपये डिपॉझिट भरणे आवश्यक होते. मात्र ते न भरले गेल्यानेच पाणीबिलाचा आकड़ा नऊ लाखापर्यंत गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र उदयनराजे भोसले यांनी ती रक्कम पालिकेकडून भरण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सातारा – एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधारणा अभियानाअंतर्गत भीमाबाई आंबेडकरनगरमधील 150 सदनिकाधारकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जानेवारी 2019 चा संदर्भ देऊन चक्क नऊ लाख रुपये पाणीबिलाची नोटीस काढल्याने घरकूल धारकांच्या झोपा उडाल्या आहेत. आधीच गळकी साठवण टाकी त्यात अवघे वीस मिनिटे पाणी अशी परिस्थिती असताना तब्बल नऊ लाख रुपये बिल येतेच कसे असा संतप्त सवाल महिलांनी विचारला आहे.
रोज उठून पालिका प्राधिकरण ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी दीडशे कुटुंबांची त्रिस्थळी यात्रा सुरू आहे. मात्र कागदी घोडे नाचवणारे सरकारी बाबू प्रत्यक्ष उपाययोजना करत नसल्याने आंबेडकर नगरामध्ये पाण्याचा ठणठणाट झाला आहे. साताऱ्यात घरकूल योजना कागदावर सुंदर वाटली तरी प्रत्यक्षात लाभार्थ्यांना अभिशाप बनली आहे. आधीच घरकूल वाटपाला विलंब त्यात वसाहतीच्या 150 फ्लॅटला लागलेले भुरट्या चोऱ्यांचे ग्रहण यामध्येच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांचे विलंब शुल्क व व्याज मिळून डॉ. भीमाबाई आंबेडकर नगराला चक्क नऊ लाख रुपये पाणीबिलाची नोटीस पाठवली आहे. प्रत्यक्ष पाणी वीस मिनिटेच येत असताना बिलाचे आकडे नऊ लाखापर्यंत जातातच कसे असा प्रश्न येथील गृहिणींना पडला आहे.
सामुहिकरित्या आलेल्या या बिलाची जबाबदारी कोण घेणार मात्र, पालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी कानावर हात ठेवल्याने हा गुंता सुटण्यापेक्षा अधिकच वाढला आहे. प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाशी आठवड्यापूर्वीच झालेल्या बैठकीत लाभार्थ्यांना तातडीने घरकुल ताबापत्र व सुविधांचे सोशल ऑडिट व लाभार्थ्यांच्या नावाने स्वतंत्र पाणीबिल देण्याचा निर्णय झाला होता मात्र, प्राधिकरणाकडून चक्क नऊ लाखाच्या पाणीबिलाचा दट्ट्या आल्याने ही कुटुंबे घायकुतीला आली आहेत. बुधवारी या नागरिकांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांचा दरवाजा ठोठावला. मात्र, त्या उपलब्ध नसल्याने जिल्हा प्रकल्प संचालक रवी पवार यांना पुन्हा निवेदन सादर करण्यात आले.
डॉ. भीमाबाई आंबेडकर वसाहतीला दीडशे कुटुंबासाठी चार इंची कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा आकारणी स्लॅब मोठा आहे. पालिकेकडून डिपॉझिट भरले गेल्यास बिलांमध्ये पन्नास टक्के कपात होऊ शकते.
संजय गायकवाड
कार्यकारी अभियंताण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सातारा