नगर – देशातील मोदी लाट आणि धनशक्तीचा वापर यामुळेच नगर दक्षिण मतदारसंघात भाजपाचा विजय झाला आहे. काम न करणाऱ्यांचा आणि विरोधकांचा आगामी तीन महिन्यांत हिशोब करु म्हणणाऱ्यांच्या हिशोबाला आम्ही तयार आहोत असे प्रत्युत्तर आ. संग्राम जगताप यांनी नूतन खासदार डॉ. सुजय विखे यांना पत्रकार परिषदेत दिले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत अवघ्या 22 दिवसांमध्ये निवडणुकीच्या स्पर्धेत आणणाऱ्या महाआघाडीचे नेते, कार्यकर्ते व मतदारांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी जगताप म्हणाले की, राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर अवघ्या 22 दिवसांत आम्ही प्रचार केला. त्या तुलनेत मला मिळालेली मते महत्वाची आहेत. त्याबद्दल मतदार आणि दोन्ही कॉंग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांचे आभार. आता आम्ही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. डॉ. विखे यांचा विजय मोदींचा चेहरा आणि धनशक्तीमुळे मिळालेला आहे. विधानसभेसाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहोत, मात्र पक्षांतर करण्याचा कोणताही विचार आपल्या मनात नाही.
देशात पुन्हा मोदीच पंतप्रधान असावेत अशी धारणा जनतेची होती. निवडणुकीतही मोदी लाट जाणवत होती. ती निकालातून स्पष्ट झाली. मोदी लाटेमुळे धनशक्तीमुळे विखेंना लीड मिळाले आहे. आगामी काळात घड्याळाचे काटे व बॅटऱ्या ठेवणार नाही. व निवडणुकीत विरोध करणाऱ्यांना हिशोब करणार आहे असे म्हणणाऱ्यांचा जनताच हिशोब चुकता करेल असे ही जगताप म्हणाले.