नवी दिल्ली – युपीए सरकार सत्तेत असतानाही अनेक सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते. परंतु, आम्ही कधीही लष्कराचे श्रेय घेतले नाही. शिवाय मते मिळवण्यासाठीही हा मुद्दा आम्ही कधी उपस्थित केला नाही. परंतु, मोदी सरकारकडून सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय वापर केला जात आहे. ही अत्यंत निंदनीय प्रकार असल्याची टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केली आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते.
मनमोहन सिंह म्हणाले कि, मुंबईमधील २६/११ दहशतवादी हल्ल्यावेळी युपीए सरकारनेही लष्कराच्या मध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा विचार केला होता. मात्र, त्यापेक्षा आम्ही पाकिस्तानला राजकीय पातळ्यांवर एकटे पडण्याचा प्रयत्न केला. व मुंबई हल्ल्यानंतर १४ दिवसांमध्ये लष्कर-ए-तोय्यबाचा म्होरक्या हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात यश आले. हाफिज सईदवर अमेरिकेने १० बिलियन डॉलरचे बक्षीसही जाहीर केले आहे.
मनमोहन सिंग यांनी १९७१ आणि १९६५ च्या युद्धांचा संदर्भ देत मोदींवर निशाणा साधला. इंदिरा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांनी पाकिस्तानविरुद्धच्या युद्धांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र त्यांनी कधीही लष्कराचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. इंदिरा गांधी आणि शास्त्रींची सध्याच्या पंतप्रधानांशी तुलनाच होऊ शकत नाही, असेदेखील ते म्हणाले.
काँग्रेसचे सरकार आल्यास पुन्हा पंतप्रधान व्हायला आवडेल का, या प्रश्नावर आता नेतृत्व तरुणांकडे सोपवण्याची वेळ आली असल्याचे मनमोहन सिंह यांनी सांगितले.