नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन करत असल्याचा आरोप करत, काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यावर सुनावणी घेत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ६ मेच्या आधी निर्णय घेण्यास सांगितले आहे.
कॉंग्रेस पक्षाने पीएम नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याच्या ९ तक्रारी दाखल केल्या आहेत. काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी अनेक वेळा केंद्रीय निवडणूक आयोगाला यासंदर्भात तक्रार केली आहे. मात्र आपल्या तक्रारीवर निवडणूक आयोग कोणतीच कारवाई करत नसल्याचे सांगून काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली होती.
दरम्यान, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आचारसंहितेचा भंग करीत असून, निवडणूक आयोग काँग्रेसच्या नेत्या सुश्मिता देव यांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई करीत नसल्याचे देव यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने याबद्दल निवडणूक आयोगाला ६ मेच्या आधी निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.